आढळा लाभ क्षेत्रात येणाऱ्या संगमनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाण्याअभावी शेतपिके करपण्याच्या मार्गावर आली होती. याबाबत चिकणी येथील ग्रामस्थांनी आमदार अमोल खताळ यांच्याकडे तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीची दखल घेत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिल्यानंतर आढळा डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आढळा लाभ क्षेत्रातील अनेक गावांमध्ये सध्या तीव्र उष्णतेमुळे पिकांची अवस्था बिकट झाली होती. पाण्याअभावी पिके वाळत असल्याने शेतकरी चिंतेत होते. विशेषतः चिकणी आणि वडगाव लांडगा परिसरातील शेतकऱ्यांनी पिके वाचवण्यासाठी तातडीने कालव्याला पाणी सोडण्याची मागणी केली होती. दरम्यान, “गोदा ते नर्मदा” जलयात्रा आश्वी परिसरात असताना आमदार खताळ यांनी ही गंभीर बाब जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मंत्री विखे पाटील यांनी तत्काळ आढळा डाव्या कालव्याला पाणी सोडण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यानंतर जलसंपदा विभागाने तातडीने कार्यवाही करत आढळा धरणाच्या डाव्या कालव्याला पाणी सोडले. कालव्याला पाणी मिळाल्याने परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून पिकांना जीवदान मिळणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. ग्रामस्थांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांचे आभार मानले आहेत.