संगमनेर । झुंजार न्यूज

 

जयहिंद लोक चळवळ कृषी विभाग आणि भाऊसाहेब संतुजी थोरात कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, संगमनेर वनस्पती शास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन जयहिंद लोकचळवळीचे अध्यक्ष मा. आ.डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या कार्यशाळेत नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्काराने गौरवण्यात आलेले जयहिंद लोकचळवळ कृषी विभागाचे मार्गदर्शक  डॉ. प्रशांत नाईकवाडी यांचे विशेष योगदान तज्ज्ञ मार्गदर्शकांना उपलब्ध करण्यात आले. सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक करताना सुधीर तांबे यांनी शेती समोरील आव्हाने आणि हवामान व बाजारभाव यांची अनिश्चितता यावर भाष्य करत जयहिंद लोकचळवळीच्या वतीने एकात्मिक शेतीसारख्या प्रकल्पांची केलेली उभारणी, शेतीमधील विविध पिकांच्या SOP ची प्रभावी अंमलबजावणी आणि आधुनिक शेतीसाठी आवश्यक गुड प्रॅक्टिसेस यांचा अंतर्भाव शेतीत होण्यासाठी जयहिंद लोकचळवळ आग्रही असते असे उपस्थित शेतकरी आणि मार्गदर्शक चेरी शेरॉन यांच्यासमोर मांडले. डॉ. तांबे यांच्याकडून केल्या जाणाऱ्या या प्रयत्नांची प्रशंसा करत इस्राइल येथील शेरॉन चेरी (तज्ज्ञ संचालक इस्राइल कृषी विभाग) यांनी सदर कार्यशाळेस उपस्थित असणाऱ्या शेतकऱ्यांस मार्गदर्शन केले.

 

इस्राइलमधील तंत्रशुद्ध शेतीचे आणि विविध आव्हानांचा सामना करून केल्या जाणाऱ्या उत्कृष्ट शेतीचे अनुभव कथन करताना शेरॉन चेरी यांनी सांगितले की, “ते स्वतः नेगेव या वाळवंटी प्रदेशात भाजीपाला आणि चेरी, टोमॅटोची दर्जेदार शेती करतात. सरासरी 50 मिलिमीटर पेक्षाही कमी पाऊस होणाऱ्या या प्रदेशात ते शासनाकडून समुद्राचे रिव्हर्स ऑसमॉसिस प्रक्रिया केलेले शेती योग्य पाणी विकत घेऊन शेतीसाठी वापरतात. पिकांस लागणारी खते ही पाण्यासोबतच ठिबक सिंचनाच्या माध्यमातून दिली जातात. पिकांवरील बुरशीजन्य आजार तसेच मुळांची चांगली वाढ व्हावी यासाठी ते ओझोनेशन या प्रक्रियेचा वापर तेथे फवारणीद्वारे तसेच ठिबक सिंचनाद्वारे शेतीमध्ये करतात. मात्र शेतीसाठी उपयुक्त असणारी पाण्यातील नैसर्गिक तत्व या प्रक्रियेसाठी प्रतिकूल ठरतात. त्यामुळे ती प्रक्रिया भारतामध्ये करणे अधिक क्लिष्ट आहे,” असे त्यांनी नमूद केले.

 

आपल्या शेतीविषयक अनुभवांविषयी पुढे बोलताना शेरॉन चेरी यांनी म्हटले की, “तेथील जमीन कुठेही उपजाऊ नसून जमीन पूर्णतः रेतीयुक्त आहे. 99.9% कुठलेही सेंद्रिय कर्ब तसेच पिकास उपयुक्त अशी खनिजे आणि सूक्ष्मजीव या जमिनीत आढळत नाही. मात्र कंपोस्टच्या मदतीने ते आवश्यक ती मूलद्रव्य पिकास उपलब्ध करून देतात. संरक्षित शेती प्रकारात पॉलिहाऊस आणि शेडनेट पद्धतीचा अवलंब त्यांच्या शेतीमध्ये करतात. तसेच स्वतः विकसित केलेले तंत्रज्ञान वापरून तेथील तापमान नियंत्रित देखील करतात. पॉलिहाऊसच्या दोन पडद्यांमध्ये हवा भरून ते तेथील तापमान नियंत्रित करतात. तसंच नेगेव वाळवंटातील कृषी संशोधन केंद्राची मदत घेऊन शेतीची मशागत, जोपासना तसेच सर्व व्यवस्थापन ते आधुनिक आणि तंत्रशुद्ध पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या शेतीमध्ये पाण्याचा वापर अतिशय काटकसरीने ते करतात. तसेच त्यात ठिबक सिंचन तुषार सिंचनाचा प्रामुख्याने वापर करतात. शेडनेट, पॉलीहाऊस येथे परागीभवनासाठी ते स्थानिक मधमाशीच्या प्रजातींचा वापर करतात,” असे चेरी यांनी स्पष्ट केले.

शेरॉन चेरी यांच्या मार्गदर्शनातील इतर ठळक मुद्दे :

१. कीटकांच्या नियंत्रणासाठी ते मित्र किडीचा देखील वापर त्यांच्या शेतीमध्ये करतात.

२. ते स्वतः त्यांचे उत्पादन वेगवेगळ्या मॉलमध्ये तसेच शॉपमध्ये कोणाच्याही मध्यस्थीशिवाय थेट विक्री करतात. त्याचा त्यांना मोठा फायदा होतो. तशी व्यवस्था तेथील शासनाने पुरस्कृत केल्याने ते अधिक फायदेशीर होते.

३. पिकाची गुणवत्ता त्याचे उत्पादन आणि हंगामाची निवड या त्रिसूत्रीमुळे त्यांना इतर शेतकऱ्यांपेक्षा अधिक नफा होतो.

४. तुम्ही जर संघटित पद्धतीने म्हणजेच गट शेती किंवा सहकार याच्या सहाय्याने जर शेती उपयोगी बाबींची खरेदी तसेच विक्री केल्यास अधिक नफा त्यातून होऊ शकतो.

५. इस्राइल शासन शेतकऱ्यास कुठलीही थेट आर्थिक मदत करत नाही. मात्र प्रत्येक पिकाचा विमा शासनाकडून काढला जातो, त्याचवेळी पिकावर शासनाकडून वाजवी कर देखील वसूल केला जातो.

६. इस्राइल शासनाकडून शेतकऱ्यांस त्यांच्या मालाच्या विक्रीचे कुठलेही बंधन नसते. त्यामुळे शेतकरी त्यांच्या मालाच्या विक्रीचे धोरण स्वतः ठरवू शकतो आणि त्याचा त्याला निश्चित फायदा होतो.

७. शासनाकडून अद्ययावत शेती तंत्रज्ञान तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांस उपलब्ध करून दिले जाते. हे इस्त्राइलमधील उत्तम शेतीचे गमक आहे. त्याच पद्धतीचे संशोधन आणि तंत्रज्ञान भारतीय कृषी विभागाने शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले तर भारतातील शेती नक्कीच फायदेशीर होईल.

८. भारतात होणारा पाऊस शेतीसाठी मुबलक आहे. कारण सरासरी ५० मिलीमीटर पाऊस झाला तरी योग्य नियोजन केल्यास आणि तंत्रज्ञानाची जोड दिल्यास ते पाणी शेतीला पुरू शकते आणि त्यातून चांगल्या पद्धतीने शेती करता येऊ शकते.

यावेळी शेतकऱ्यांच्या देखील सर्व शंकांचे निरसन कार्यशाळेत तज्ज्ञांकडून केले गेले.

डॉ. सुधीर तांबे यांनी इस्राइल मधील शेतकरी त्यांच्या व्यवसायात किती समाधानी आहेत? असे विचारले असता तेथील सुमारे 80% शेतकरी हे समाधी समाधानी असल्याचे महत्त्वपूर्ण निरीक्षण चेरी शेरॉन यांनी सर्वांसमोर मांडले.

दरम्यान, या कार्यक्रमास जयहिंद लोकचळवळ आणि सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुधीर तांबे, रोमिफ इंडिया चे संचालक डॉ. प्रशांत नाईकवाडी, श्री रमेश गुंजाळ स. म. भा. थो. सहकारी साखर कारखाना संचालक, प्राचार्य डॉ .दीनानाथ पाटील ,उपप्राचार्य डॉ बाळासाहेब वाघ, विश्व हायटेक नर्सरी चे  वीरेंद्र थोरात, प्रगतिशील शेतकरी  आनंदा नाथा गाडेकर, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी  तुकाराम गुंजाळ, संदीप गुंजाळ ,  संदीप पवार, संजय वाकचौरे,  रवींद्र लेंडे, संगमनेर व अकोले तालुक्यातून आलेले प्रगतिशील व कृतिशील शेतकरी उपस्थित होते. सदर कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र शासन वसंतराव नाईक पुरस्कार मिळालेले  प्रशांत नाईकवाडी व  तुकाराम गुंजाळ यांचे अभिनंदन करण्यात आले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन जयहिंद लोकचळवळ कृषी विभाग प्रमुख डॉ अभयसिंह जोंधळे यांनी केले तर आभार दिनानाथ पाटील यांनी मानले

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *