थोरात कारखान्याकडून चंदनापुरी घाटात वृक्षारोपण
दंडकारण्य अभियान वृक्षारोपण संवर्धनाची लोकचळवळ –मा. आ. डॉ. सुधीर तांबे
संगमनेर । झुंझार न्यूज
थोर स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी भावी पिढ्या व हरितसृष्टीच्या संवर्धनासाठी दंडकारण्य अभियान सुरू केले. या अभियानामुळे तालुक्यासह राज्यांमध्ये वृक्षरोपण व संवर्धन वाढीची मोठी लोक चळवळ निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन दंडकारण्य अभियानाचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांनी केले आहे .थोरात कारखान्याच्या वतीने रिमझिम पावसामध्ये चंदनापुरी घाटामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
चंदनापुरी घाट येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले यावेळी ते बोलत होते या प्रसंगी प्रकल्प प्रमुख सौ दुर्गाताई तांबे ,कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले, हौशीराम सोनवणे ,संचालक विनोद हासे, विजय राहणे, गुलाबराव कडलग,विलास शिंदे,रामनाथ कुटे ,सतीश वर्पे, दिलीप नागरे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात, जनरल सेक्रेटरी किरण कानवडे ,कार्यालय अधीक्षक कृष्णा दिघे, यांच्यासह कारखान्याचे सर्व विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी चंदनापुरी घाटामध्ये भर पावसात कारखान्याच्या कर्मचारी व कार्यकर्त्यांनी पावसाची गाणी गात, रिमझिम पावसात भिजत, आनंदाने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले.
यावेळी बोलताना माजी आमदार डॉ सुधीर तांबे म्हणाले की, स्वतःच्या शरीराच्या काळजीप्रमाणे सृष्टीच्या शरीराची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. आणि यासाठी पर्यावरण संवर्धन या अत्यंत महत्त्वाचे आहे. निसर्गाने माणसाला भरभरून दिले आता माणसाने निसर्गाला दिले पाहिजे. ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येमुळे दुष्काळ ,अतिवृष्टी सारखे संकटे निर्माण होतात. प्रदूषण ही सध्या मोठी समस्या निर्माण झाली असून यावर मात करण्यासाठी प्रत्येकाने ऑक्सिजन देणारे वृक्ष रोपण व संवर्धन केलेच पाहिजे. ऑक्सीजन चे महत्व सहा वर्षांपूर्वी जगाला कळाले आहे मात्र कोरोना गेला आणि लोक त्या परिस्थितीला विसरले. मात्र आपल्याला सजीव सृष्टीच्या रक्षणाकरता पर्यावरण सृष्टीचे संवर्धन केलेच पाहिजे असे ते म्हणाले.
तर सौ दुर्गाताई तांबे म्हणाल्या की काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात व मा. आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेले दंडकारण्य अभियान राज्यात पोहोचले. पर्यावरण संवर्धनाबाबत प्रत्येकामध्ये जाणीव जागृती झाली यामध्ये महिलांचाही मोठा सहभाग ठरला असल्याचेही त्या म्हणाल्या.
तर पांडुरंग पा. घुले म्हणाले की, कारखान्याने कायम तालुक्याच्या विकासाचे हृदय म्हणून काम केले आहे. दंडकारण्य अभियानामध्ये वृक्षारोपण व संवर्धनाकरता कारखान्याच्या माध्यमातून चंदनापुरी घाटामध्ये काम केले जाणार आहे. याचबरोबर रस्त्याच्या दुतर्फा रंगीबेरंगी फुल झाडे लावण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी प्रा बाबा खरात यांनी या रे या सारे या मिळून दंडकारण्य जोपासू या यासह विविध गीते गायली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. तर विजय राहणे यांनी आभार मानले यावेळी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
