भारतीय स्वातंत्र्याचा ८० वा वर्धापन दिन संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघ (राजहंस दूध संघ) येथे मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या मंगल प्रसंगी दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांच्या शुभहस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न झाले.
शनिवारी १५ ऑगस्ट रोजी सकाळी दूध संघाच्या मुख्य प्रांगणात हा सोहळा पार पडला. ध्वजारोहणानंतर उपस्थित सर्वांनी राष्ट्रगीत गाऊन तिरंग्याला मानवंदना दिली. यावेळी संपूर्ण परिसर ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’च्या घोषणांनी दुमदुमून गेला होता.
याप्रसंगी बोलताना चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी सर्व शेतकरी सभासद आणि कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. देशाच्या प्रगतीमध्ये सहकार क्षेत्राचा वाटा मोठा असून, दूध संघाने श्वेतक्रांतीच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी दिली आहे, असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमास दूध संघाचे कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी यांच्यासह संघाचे सर्व संचालक, पदाधिकारी , विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवी काळानंतरच्या ८० व्या वर्षात पदार्पण करत असताना, दूध संघाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपण्याचे आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी मिठाई वाटप करून आनंद साजरा करण्यात आला.