अकोले । झुंजार न्यूज
गाडीवर दगड मारून महिलेचे मानसिक खच्चीकरण होत नसते तर उलट सावित्रीच्या लेकीत लढायचे बळ येत असते. राजूरला माझ्या गाडीवर झालेली दगडफेक नक्कीच राजकीय आकसापोटी आणि उद्देश ठेवून झाली पण सुदैवाने मी वाचले. सत्ताधारी बलाढ्य शक्तीपूढे जनतेची साथ घेऊन मी सर्वसामान्यांचा आवाज बनून पुढे चाललेले आहे ते काहींना बघवत नाहीये. दगडं मारली तरी मी खचणार नाही उलट दुप्पटीने संघर्ष करून लढणार व जिंकणारच असा विश्वास वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवतें यांनी व्यक्त केला .

सोमवारी रात्री अकोले तालुक्यातील राजूर भागातील प्रचार आटोपून माघारी परतत असताना, चितळवेढे शिवारात त्यांच्यावर अज्ञातांनी दगडफेक केली. त्या दगडफेकीत त्यांच्या इनोव्हा गाडीची समोरची काच फुटून सर्व काचा त्यांच्या अंगावर आल्या सुदैवाने त्या त्यात जखमी झाल्या नाहीत. परंतु त्यांच्या गाडीचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले. त्यांच्यावर झालेल्या या भ्याड हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे.

सावित्रीबाई फुले यांना समाजात क्रांती घडवून आणायची होती त्यावेळी त्यांच्यावर देखील चिखल फेक, दगडफेक झाली. परंतु समाजक्रांतीची ज्योत त्यांच्या मनात कित्येक पटीने धगधगत राहिली व त्यातुन त्यांनी समाजात महिलांसाठी एक क्रांती घडवून आणली. मी त्यातीलच एक सावित्रीची लेक आहे. बहुजन समाजाची असले तरी 21 व्या शतकातील महिला आहे. मला महिलांसाठी, युवकांसाठी, शेतकऱ्यांसाठी एक नव्या क्रांतीची विकासाची ज्योत पेटवायची आहे. त्यामुळे मी निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे.

माझ्यापुढे दोन आजी माजी खासदारांसाठी काम करणारी सत्ताधाऱ्यांची बलाढ्य ताकद आहे. परंतु ज्यांचे उद्देश चांगले असतात त्यांच्यासोबत स्वतः ईश्वरी आशीर्वाद असतो. आणि त्याच ईश्वरी आशिर्वाद व जनतेच्या आशीर्वादाने मी या भ्याड हल्ल्यातून सुखरूप वाचले आहे. या हल्ल्याने मी डगमगून न जाता अधिक जोमाने कामाला लागणार आहे.

माझ्यावर झालेल्या हल्ल्याची तक्रार मी पोलिसांकडे केली आहे. पोलीस त्यांचे काम निश्चितच करतील. पण मी न थांबता माझे काम अधिक जोमाने करणार आहे. माझे लक्ष पांगविण्यासाठी व मानसिक खच्चीकरण करण्यासाठी माझ्या विरोधात हा डाव का असेना पण नारीशक्ती अफाट असते हे मी दाखवून देणार असे उत्कर्षा रुपवते यांनी म्हटले आहे.
