आश्वी | झुंजार न्यूज
विखे-पाटील घराणं हे राजकारणातील मोठं नाव आहे. नगरच्या राजकारणावर दबदबा असलेलं हे घराणं आहे. विखे-पाटील घराण्यातील चौथी पिढीही आता राजकारणात आली आहे. सहकार, समाजकारण आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रात विखे घराण्याचा दबदबा आणि लौकीक आहे. नामदार राधाकृष्ण विखे-पाटील हे राज्यातील बडे नेते आहेत. त्यांच्या १५ जून या जन्मदिनी निमित्ताने होत असलेल्या वाढदिवसानिमित्ताने राजकीय कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा आहे .
राधाकृष्ण विखे-पाटील यांचा जन्म 15 जून 1959 मध्ये झाला. सामाजिक, राजकीय पार्श्वभूमी असलेल्या घराण्यात जन्मलेल्या नामदार राधाकृष्ण विखे यांना लहानपणापासूनच समाजकारणाचं बाळकडू मिळालं होतं. त्यांचे आजोबा विठ्ठलराव विखे-पाटील यांनी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे राज्यातील पहिले पब्लिक स्कूल प्रवरानगरला सुरू केले. याच पब्लिक स्कूलमध्ये राधाकृष्ण विखे यांना पहिलीत प्रवेश देण्यात आला. आजोबांच्या आग्रहाखातरच त्यांना वसतिगृहात घालण्यात आलं. तिथूनच राधाकृष्ण विखे त्यांच्यात सामाजिक जाणीव निर्माण झाली. या पब्लिक स्कूलमध्ये त्यांनी इयत्ता अकरावीपर्यंतचे शिक्षण घेतले. अकरावीनंतर धुळे, कोल्हापूर कृषी विद्यापीठात शिक्षण घेत असताना ते सामाजिक कार्याकडे ओढले गेले. कोल्हापुरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी संपही केला होता. विखे घराण्याने नगरमध्ये सहकार क्षेत्रात मोठं योगदान दिलं आहे. आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना नगरमधील प्रवरानगर येथे सुरू केला. त्यांचे आजोबा विठ्ठलराव विखे पाटील यांनी सुरू केला. सहकार, समाजकारण आणि राजकारणात विखे-पाटील घराण्याचं मोठं योगदान ठरले आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसमधून राजकारणास सुरुवात केली. 1986मध्ये ते युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. या काळात त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले. भारत निर्माण अभियानांतर्गत भंडारदरा ते जामखेड अशी पायी दिंडी काढली या पाय दिडीस राजीव गांधी उपस्थीतीत होते .

विखे यांच्या राजकारणाची सुरुवात खऱ्या अर्थाने 90च्या दशकात सुरू झाली. त्यांनी 1994मध्ये शिर्डी विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. आजही या मतदारसंघाचे ते निर्विवादपणे नव्यांदा प्रतिनिधीत्व करत आहेत.

राधाकृष्ण विखे पाटील यांचे वडील तत्कालीन खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला. वडिलांपाठोपाठ राधाकृष्ण विखे यांनीही आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत ते शिर्डी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले व पहिल्यांदा कृषीमंत्री झाले.

वडिलांनी शिवसेनेत प्रवेश केला म्हणून राधाकृष्ण विखे-पाटील यांनाही शिवसेनेत प्रवेश करावा लागला होता. या इतिहासाची पुनरावृत्ती 2019मध्ये पाह्यला मिळाली, पण थोड्या फरकाने. आधी वडिलासोबत मुलाला शिवसेनेत जावं लागलं. तर 2019मध्ये मुलासोबत वडिलांना भाजपमध्ये जावं लागलं. 2019मध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे राज्याचे विरोधी पक्षनेते असतानाही विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देऊन आणि काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राधाकृष्ण विखे यांनी मुलासोबत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्या अर्थाने ही इतिहासाची पुनरावृत्तीच समजली जात असून तेव्हा गृहनिर्माण मंत्री झाले .

अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी शिक्षण व परिवहन मंत्री म्हणून काम पाहिले. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर ते कृषीमंत्री झाले होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा देवून गृहनिर्माण मंत्री झाले . त्यानंतर राजकिय मोठा भुंकप होवून निर्माण झालेल्या एकनाथ शिंदे सरकारच्या मंत्री मंडळात ते महसूल मंत्री झाले . त्यानंतर 2024 ला झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वा खालील सरकार मध्ये ते जलसंपदा मंत्री बनले . 2009 पासून ते आजपर्यंत शिर्डी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. आहिल्यानगरमधील प्रवरा शिक्षण प्रसारक संस्थेचे ते प्रमुख आहेत.

नगरमध्ये राधाकृष्ण विखे-पाटील आणि बाळासाहेब थोरात यांचा संघर्ष सर्वश्रृत आहे. नगरवर पकड ठेवण्यासाठी या दोन्ही नेत्यांमध्ये कायम चुरस राहिली आहे. नगरमध्ये बाळासाहेब थोरात यांचा एक गट आहे. त्यामुळे या गटाचं आणि विखे-पाटील यांच्यातील संघर्ष नेहमीच पाहायला मिळत आहे . त्यातच थोरात यांचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी चांगले संबंध आहेत. तर विखे घराण्याचं पवारांशी पटत नसल्याने नगरमध्ये हा संघर्ष नेहमीच पाहायला मिळतो .

राधाकृष्ण विखे पाटील हे महाराष्ट्रातील मोठे नेते असून त्यांचा स्पष्टवक्तेपणा , आक्रमक भूमिका व दबावतंत्रामुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रभाव असून स्पर्थक निर्माण झाल्याने त्यांची राजकीय इमेज कमी करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे . मात्र, नगरच्या राजकारणावर त्यांची मजबूत पकड आहे. विशेष म्हणजे नगरमधील सर्वच नेते नगर जिल्ह्यापुरताच विचार करत असतात. त्याला कारणही तसंच आहे. नगर हा राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. या जिल्ह्यात एकूण 12 विधानसभा मतदारसंघ आहे. त्यामुळे 12 आमदारांची बेगमी करून राज्याच्या राजकारणात उपद्रव्यमूल्य निर्माण करण्याचा प्रत्येक नेत्याचा प्रयत्न असतो.

राजकीय वाऱ्याचा अचूक अंदाज असणाऱ्या राज्यातील मोजक्या नेत्यांपैकी विखे पाटील एक आहेत. त्यांच्या वडिलांनी शिवसेनेत प्रवेश केला. वाजपेयींच्या मंत्रिमंडळात त्यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री, अवज उद्योग खात्याचे कॅबिनेट मंत्रीपदही भूषविलं. पण शिवसेना-भाजपला घरघर लागल्याचं कळताच बाळासाहेब विखेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राधाकृष्ण विखे यांनीही युतीची सत्ता येत असल्याचं पाहून शिवसेना-भाजपशी चांगले संबंध ठेवले. 2019मध्ये पुन्हा युतीची सत्ता येणार असल्याचं लक्षात येताच आणि भाजपचाच मुख्यमंत्री होण्याची शक्यता वाटताच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. परंतु, राज्यात महाआघाडीचं समीकरण निर्माण झाल्याने त्यांच्या आकांक्षांवर पाणी फेरले गेले” मात्र अडीज वर्षातचं मोठा राजकिय भूंकप झाला . शिवसेनेचे निम्म्यापेक्षा जास्त आमदार फुटले व एकनाथ शिंदेच्या बरोबर गेल्याने भाजपा – शिंदे सेना ही युती झाल्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यात सरकारमध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे महसूल मंत्री झाले .

अडीज वर्षात धडाकेबाज निर्णय घेत महसूल विभागाचा चेहरा – मोहराचं बदलून टाकला . त्यामुळे राज्यात ते प्रमुख नेत्यामध्ये गणले जावू लागले मराठा आरक्षणाबरोबर विविध होणारे मोर्चे , आंदोलन यांच्याशी समेट घडविण्यासाठी विखे पाटील हा पर्याय सरकार राहत असल्याचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले . मात्र झालेल्या 2024 च्या लोकसभेत मुलाचा झालेला पराभवामुळे त्यांनी आपल्या राजकिय परिपाठाची दिशाचं वेगळी करत अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 पैकी 10 आमदार निवडून आणतं जणु काय ? लोकसभेची उणीवचं भरून काढल्याचे चित्र निर्माण झाले राज्यात एक प्रभावी राजकिय नेतृत्व त्याच्या रुपाने सिध्द झाले .

