गुंजाळवाडी येथील गगनगिरी महाराजांचा सप्ताह हा अध्यात्म आनंदाची मोठी पर्वणी
संगमनेर । झुंझार न्यूज
मागील सात दिवसांपासून अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये गगनगिरी महाराज यांचा सप्ताह सुरू आहे. या सप्ताह मधून महिलांची मोठी उपस्थिती आणि अध्यात्म आनंदाची मोठी पर्वणी मिळाली आहे. परमपूज्य गगनगिरी महाराज यांचे निसर्गावर खूप प्रेम होते. प्रत्येकाने निसर्ग जपणे ही गगनगिरी महाराज व परमेश्वरांची सेवा असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
गुंजाळवाडी येथे सुरू असलेल्या परमपूज्य विश्वविभूषित स्वामी गगनगिरी महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या काल्याच्या किर्तनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी समाज प्रबोधनकार हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख यांचे काल्याचे किर्तन झाले. तर व्यासपीठावर खासदार भाऊसाहेब वाकचौरे, सौ दुर्गाताई तांबे, दिलीपराव शिंदे ,आबासाहेब थोरात, राजेंद्र गुंजाळ, हेमंत पवार, महाराजांचे नातेवाईक माने सरकार ,पाटणकर सरकार, नवनाथ आरगडे , नवनाथ महाराज आंधळे यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, 2002 मध्ये समनापुर येथे गगनगिरी महाराज यांच्या सप्ताहाला आपण सुरुवात केली. जर तीन वर्षांनी अधिक मासानिमित्त संगमनेर तालुक्यामध्ये या सप्ताहाचे आयोजन होते. गुंजाळवाडी येथील या भव्य परिसरामध्ये हा सप्ताह मोठ्या आनंदाने संपन्न झाला.
हा सप्ताह यशस्वी होण्यामध्ये दिलीपराव शिंदे आबासाहेब थोरात याचबरोबर त्यांचे सहकारी यांनी मोठे कष्ट घेतले यातून हा भक्तीचा महासागर येथे उपस्थित राहिला. प्रत्येक दिवशी महिलांची मोठी उपस्थिती व त्यांचा उत्साह मोठा होता. दररोज सुमारे 70 हजार भाविकांनी महाप्रसाद घेतला. इतके मोठे नियोजन सोपे नसते यामध्ये सर्वांचे सहकारी आणि ईश्वराचे आशीर्वाद असतात.
गगनगिरी महाराज यांचे आपल्या तालुक्यावर कायम प्रेम होते त्यांचा कायम आशीर्वाद मिळाला. त्यांनी निसर्गावर प्रेम केले माणूस निसर्गातून जन्माला आला आणि पुन्हा निसर्गात जायचे आहे असे ते सांगायचे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे याप्रमाणे प्रत्येक नागरिकांनी निसर्ग जपले पाहिजे कारण निसर्ग जपणे ही परमेश्वराची खरी सेवा आहे.
सात दिवस अध्यात्माचा गजर या ठिकाणी झाला हा सर्वांना आध्यात्मिक शांती देणारा अनुभव होता. प्रत्येक सप्ताह मध्ये आयोजकांच्या वतीने वृक्षांचे वाटप केले जाते हे वृक्ष म्हणजे महाप्रसाद आहे 2002 मध्ये लावलेले वृक्ष आता फळ देत आहेत. म्हणून वृक्ष जपा .

वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावर राजकारण श्रीमंत गरीब लहान-मोठा असा कोणताही फरक नाही. येथे सर्व समान आहेतm येथे यावे आणि हरिनामाचा गजर करावा असे हे वातावरण आहे.
यावर्षी अलनिनोच्या प्रभावामुळे पाऊस कमी होतो की काय अशी भीती आहे. परंतु परमेश्वराच्या आणि गगनगिरी महाराजांच्या आशीर्वादाने सर्वत्र चांगला पाऊस पडावा सर्व नागरिक सुखी समाजाने व आनंददायी होऊ दे अशी प्रार्थना त्यांनी गगनगिरी महाराज चरणी केली.
यावेळी हजारो भाविक भक्तगण स्वामी गजरात व परमेश्वराच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन गेले
