पिढ्यानपिढ्याच्या समृद्धी करता राजकारण विरहित हा मार्ग सरळ व्हावा
संगमनेर । झुंझार न्यूज
मुंबई-नाशिक- पुणे हा गोल्डन ट्रँगल असून नाशिक पुणे सरळ रेल्वे करता आपण सातत्याने पाठपुरावा केला. यासाठी सर्व काम पूर्ण होऊन भूसंपादनाचे सुमारे 500 कोटींपेक्षा जास्त रक्कमही शेतकऱ्यांना देण्यात आली. आता मात्र वेगळी कारणे सांगितली जात आहेत. केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी या मार्गाबाबत केलेले विधान हे अत्यंत दुर्दैवी असून या विभागाच्या विकासाकरता नाशिक पुणे रेल्वे ही सरळ मार्ग होणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते मा.महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले असून भविष्यातील अनेक पिढ्यांसाठी राजकारण विरहित आपल्या सर्वांना सरळ रेल्वे मार्गासाठीच आग्रह धरावा लागणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नाशिक पुणे सरळ रेल्वे मार्ग रद्द केल्याचे विधान नुकतेच केले आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्रात सह पुणे जिल्ह्यातील उत्तर भागांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा मा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, नाशिक पुणे रेल्वे बाबत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलेले वक्तव्य या विभागासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवी आहे.
मुंबई नाशिक पुणे हा गोल्डन ट्रँगल म्हणून ओळखला जातो. विकासाच्या दृष्टीने हा गोल्डन ट्रँगल देशाच्या आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. याकरता नाशिक पुणे रेल्वे होणे हे अत्यंत गरजेचे आहे.
याकरता आपण सातत्याने पाठपुरावा केला. त्या दृष्टीने कामही झाले. रेल्वेसाठी जमिनी भूसंपादित करून सुमारे 500 कोटींपेक्षा जास्त रक्कम ही देण्यात आली. असे सगळे झाले असताना आता मात्र जीएमआरटी आणि अन्य गोष्टी सांगितल्या जात आहेत. यावरून हा रेल्वे मार्ग रद्द केल्याचे सांगितले जात आहे .हे अत्यंत दुर्दैवी आहे.
नवीन मार्गदर्शक सुचवला आहे त्या मार्गातून उपलब्धी काय किंवा त्याचा फायदा काय असे विचारले असता तर काहीही दाखवता येणार नाही.
म्हणून नाशिक पुणे रेल्वे ही सरळ मार्गे झाली पाहिजे यासाठी आपल्या सगळ्यांना आग्रह धरावा लागणार आहे. हा विषय निवड आजच्या राजकारणाचा नाही किंवा कोणत्याही राजकारणी व्यक्तीचा नाही. राजकारणा पलीकडे जाऊन विकासाच्या वाटचालीसाठी सरळ रेल्वे अत्यंत महत्त्वाची आहे.
पिढ्यानपिढ्याच्या भविष्यासाठी आणि या विभागाच्या समृद्धीसाठी गोल्डन ट्रँगल जोडणारा हा सरळ रेल्वे मार्ग झाला पाहिजे. यासाठी आपल्या सगळ्यांना आग्रह धरावा लागणार आहे आणि याकरता सातत्य ठेवून ते मंजूर करून घ्यावे लागणार आहे अशी प्रतिक्रिया मा. महसूल व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
नाशिक पुणे रेल्वे मार्ग रद्द करून शिर्डी अहिल्यानगर मार्गे नवीन नेण्याबाबत झालेल्या घोषणेनंतर नाशिक सिन्नर संगमनेर जुन्नर नारायणगाव खेड मंचर यांसह उत्तर महाराष्ट्र व पुणे जिल्हा यामधील विविध तालुक्यांमधील नागरिकांमध्ये व विशेषता तरुणांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
नाशिक पुणे रेल्वे मार्ग रद्द करणे म्हणजे उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला खो घालण्याचे पाप – आमदार सत्यजित तांबे
नाशिक पुणे या मेट्रो शहरांना जोडण्यासाठी सरळ रेल्वे मार्ग व्हावा याकरता मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने पाठपुरावा करून हा रेल्वे मार्ग मंजूर करण्यात आला. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना पैसे दिले गेले. मात्र नवीन सरकार आले आणि मार्ग बदलण्याचा घाट घातला गेला. याबाबत या मार्गावरील सर्व लोकप्रतिनिधी आणि जनतेला घेऊन आपण संघर्ष समिती तयार केली. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णवी यांची भेट घेतली तर आपण मुख्यमंत्री व विविध अधिकाऱ्यांची सरळ मार्गासाठी भेट घेतली. रेल्वे मार्ग सरळ झाला पाहिजे ही आमची मागणी आहे. मात्र केंद्रीय मंत्र्यांनी केलेले विधान अत्यंत दुर्दैवी असून उत्तर महाराष्ट्राच्या विकासात खो घालण्याचे पाप केले आहे .त्यांचा हा निर्णय अत्यंत असंवेदनशील असून आपण या निर्णयाचा तीव्र निषेध करत असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे.

