“देशातील अनेक भागांत उद्भवणारी पुराची भीषण परिस्थिती रोखण्यासाठी नदी जोड प्रकल्प राबवणे ही काळाची गरज आहे. ही संकल्पना मुळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडली होती. जर त्यांच्या काळातच हा प्रकल्प पूर्ण झाला असता, तर आज देशाला पुराच्या संकटाचा सामना करावा लागला नसता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हे काम युद्धपातळीवर सुरू आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना . रामदास आठवले यांनी शिर्डी येथे केले.
शिर्डी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सामाजिक, राजकीय आणि ऐतिहासिक मुद्द्यांवर भाष्य केले.
१०० वर्षांतील परिवर्तन आणि सामाजिक स्थिती
आठवले पुढे म्हणाले की, “गेल्या १०० वर्षांत देशात मोठे सामाजिक परिवर्तन झाले आहे. जातीभेद आणि अस्पृश्यतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. एकेकाळी चवदार तळ्याचे पाणी दलितांना घेण्याची मुभा नव्हती, त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मोठा संघर्ष करावा लागला. आज परिस्थिती बदलली असली तरी, काही ठिकाणी आजही दलितांवर अत्याचार होत आहेत. अशा घटनांची कारणे शोधून त्यावर ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.”
१४ ऑक्टोबरपासून ‘सामाजिक समता मार्च‘
रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आगामी काळात राज्यात मोठी जनजागृती करण्यात येणार असल्याची घोषणा आठवले यांनी केली. “सामाजिक सलोखा आणि समतेचा संदेश देण्यासाठी १४ ऑक्टोबरपासून ‘सामाजिक समता मार्च’ यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेचा प्रारंभ सातारा येथून होईल आणि समारोप कोल्हापूर येथे करण्यात येईल. ही यात्रा संपूर्ण राज्यात फिरून जिल्ह्या-जिल्ह्यात पोहोचेल,” अशी माहिती त्यांनी दिली.
२०२९ मध्येही मोदीच पंतप्रधान; राज्याच्या राजकारणात स्थिरता
राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना आठवले यांनी पंतप्रधान मोदींच्या कामाचे कौतुक केले. “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वांना सोबत घेऊन विकासाचे धोरण राबवत आहेत. त्यांची लोकप्रियता पाहता २०२९ मध्ये सुद्धा तेच पंतप्रधान होतील, यात शंका नाही. तसेच महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या कोणतेही मोठे बदल होणार नाहीत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपला कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण करतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री (देवेंद्र फडणवीस व अजित पवार) यांचे काम अत्यंत उत्तम रीतीने सुरू आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेला रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते अविनाश महातेकर, काकासाहेब खंबाळकर, माजी खासदार विजयराव वाकचौरे, श्रीकांत भालेराव, दीपकराव गायकवाड, सुरेंद्र थोरात, भिमा बागुल यांसह पक्षाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.