नागरिकांचे हरविलेले मोबाईल शोधण्यात आश्वी पोलिसांना मोठे यश आले आहे. आश्वी पोलीसांनी सुमारे दोन लाख रुपये किमतीचे ११ मोबाईल फोन शोधून काढत मूळ मालकांच्या स्वाधीन केले. विशेष म्हणजे, निमगावजाळी येथील एका तरुणाचा हरवलेला मोबाईल थेट आसाम राज्यातून हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून नागरिकांचे मोबाईल गहाळ होण्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दि. १ जानेवारी २०२६ ते १४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत विशेष शोधमोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत सॅमसंग, ओप्पो, व्हिवो या नामांकित कंपन्यांचे सुमारे १ लाख ९८ हजार ४९५ रुपये किमतीचे एकूण ११ मोबाईल फोन तांत्रिक तपासाच्या आधारे शोधण्यात आले. आवश्यक कायदेशीर पडताळणी पूर्ण केल्यानंतर हे मोबाईल संबंधित तक्रारदारांना पोलीस ठाण्यात बोलावून सुपूर्द करण्यात आले.
मोबाईलचा शोध घेण्यासाठी ‘सीईआयआर’ प्रणाली, मोबाईलचे आयएमईआय क्रमांक आणि नेटवर्क डेटाचे बारकाईने विश्लेषण करण्यात आले. पोलीस शिपाई गणेश तळपाडे यांनी घेतलेल्या तांत्रिक परिश्रमांमुळे दुर्गम भागातून, तसेच थेट आसामसारख्या दूरच्या राज्यातूनही मोबाईलचा ठावठिकाणा शोधून काढणे पोलीसांना शक्य झाले.