श्रीरामपूर । झुंजार न्यूज

ज्या लोकांनी संविधानाचा अनेकदा अपमान केला, तेच आज आम्ही संविधान बदलतोय, असे आरोप करताहेत. मात्र, जोपर्यंत आम्ही आहोत, तोपर्यंत संविधान कोणी बदलणार नाही. जर कोणी संविधान बदलण्याचा प्रयत्न केल्यास, त्याची गय करणार नाही, असा खणखणीत इशारा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी दिला.

 

येथील म्हाडा कॉलनीतील मैदानावर संविधान व नारीशक्ती सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यात ते बोलत होते. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, माजी मंत्री अविनाश महातेकर, राजाभाऊ सरोदे, बी. के. बर्वे, राजाभाऊ कापसे, भीमा बागूल, भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लघे, ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते, जिल्हा सरचिटणीस नितीन दिनकर, भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे, रिपाई दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे आदी उपस्थित होते. 

यावेळी एक हजार संविधान पुस्तिकांसह एक १ हजार साड्यांचे वाटप करण्यात आले.
आठवले म्हणाले की, ज्यांना आपले आमदार, कार्यकर्ते सांभाळता येत नाहीत, ते राज्याला कसे सांभाळतील, असा प्रश्न उपस्थित करत महविकास आघाडीच्या नावाने दंड थोपटून उभे राहिलेले आहेत. मात्र २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आमचेच सरकार येणार आहे. राज्यात ४८ पैकी ४५ जागा आमच्या राहणार असून, तीन जागा शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस घेतील, अशी मिश्किल टिप्पणी करून मराठा समाजातील गरिबांना आरक्षण मिळाले पाहिजे, ही भूमिका आम्ही मांडली. 
विखे म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले. त्याच संविधानावर देशाची वाटचाल सुरू आहे. पंतप्रधान मोदींच्या व्यक्ती द्वेषातून इंडिया आघाडी स्थापन झाली. मात्र या आघाडीत बिघाडी झाली आहे. ज्यांचे पक्ष गेले, ज्यांचे अस्तित्त्व पणाला लागले आहे.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विकी कापसे , राकेश कापसे , भिमा बागुल , सुभाष त्रिभुवन आदीसह युवकांनी परिश्रम घेतले .

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *