गुवाहाटी । झुंजार न्यूज
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान सर्वश्रेष्ठ संविधान आहे.संविधनामुळे भारतीय लोकशाही मजबूत आहे. संविधानाला कुणाचाही धोका नाही.संविधान धोक्यात असल्याचा प्रचार करणाऱ्या विरोधी पक्षाची आघाडीच धोक्यात आहे. संविधान धोक्यात नाही उलट काँग्रेस आणि इंडी आघाडीच धोक्यात आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.
रिपब्लिकन पक्षाच्या आसाम प्रदेश च्या वतीने येथील बालापारा बॉंगाईगाव येथे भव्य संविधान सन्मान रॅली चे आयोजन करण्यात आले होते.त्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ना.रामदास आठवले बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी रिपाइंचे आसाम प्रदेश अध्यक्ष उत्पल डेका ; ईशान्य भारत प्रभारी विनोद निकाळजे; निजामुद्दीन करीम; रुमी शर्मा; लुम्बिनी; कमल कलीता; कल्याण शर्मा; गुजरातचे रिपाइंचे प्रभारी जतीन भुट्टा; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान हे समता; बंधुता; राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक न्याय देणारे आहे. संविधान कोणीही बदलू शकत नाही. संविधान बदलण्याचा खोटा प्रचार करून समाजात फूट पाडणे चूकीचे आहे. संविधान कुणाच्याही बापाला बदलता येणार नाही.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे तर संविधान समर्थक आहेत.त्यांनी नवीन संसद भवन ला संविधान भवन नाव दिले आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना विरोधकांनी कितीही बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी ते बदनाम होणार नाहीत. त्यांनी सर्वांसाठी चांगले काम केले आहे.त्यामुळे जगात नरेंद्र मोदी प्रथम क्रमांकाचे लोकप्रिय नेते ठरले आहेत. रिपब्लिकन पक्ष नरेंद्र मोदींच्या पाठीशी आहे असे ना.रामदास आठवले म्हणाले.
ईशान्य भारतात रिपब्लिकन पक्ष वाढत आहे. ईशान्य भारतातील आसाम सोबत मेघालय; अरुणाचल प्रदेश; मणिपूर; नागालँड; त्रिपुरा आणि मिझोराम मध्ये रिपब्लिकन पक्ष प्रबळ होत आहे. देशभर रिपब्लिकन पक्ष वाढत आहे. देशभर रिपब्लिकन पक्ष प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना साथ देणार आहे असे ना.रामदास आठवले म्हणाले.
