सुमधुर भक्ती संगीतात अमृत उद्योग समूहाच्या वतीने सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांना आदरांजली



संगमनेर । झुंजार न्यूज 

 

कृषी औद्योगिक क्रांतीतून प्रेरणा घेत सहकाराच्या माध्यमातून तालुक्यातील गोरगरीब माणसांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी आदर्श तत्व आणि विचार घेऊन सहकार चळवळीत मोठे योगदान दिले. तालुक्याच्या विकासाची रचनात्मक पायाभरणी करताना त्यांनी समाज विकासासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले असून त्यांचे जीवन कार्य पुढील पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार युवक काँग्रेसच्या अध्यक्षा कॅन्सर तज्ञ डॉ जयश्रीताई थोरात यांनी काढले आहे.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरील प्रेरणास्थळ येथे अमृत उद्योग समूहाच्या वतीने आयोजित 14 व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲपल माधवराव कानवडे कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब मोहोळ दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, लक्ष्मणराव कुटे, सुधाकर जोशी, संपतराव डोंगरे, गणपतराव सांगळे,संतोष हासे, रामदास वाघ, आर.बी.राहणे,रोहिदास पवार, प्रा.बाबा खरात,दत्तू थोरात, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, केशवराव जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संदिपानी गुरुकुल घुलेवाडी येथील वारकरी विद्यार्थ्यांनी गायलेल्या सुमधुर भक्ती गीत आणि भावगीतांनी आदरांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी बोलताना डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, स्वर्गीय सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी स्वातंत्र्य चळवळीत योगदान दिल्यानंतर स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सहकारातून मोठे काम केले. पाण्यासाठी मोठा संघर्ष केला. मीटर हटावची चळवळ राज्यभर राबवली.सहकाराबरोबर शिक्षण आणि दुग्ध व्यवसायामधून ग्रामीण भागात आर्थिक समृद्धी निर्माण केली. शिस्त, पारदर्शकता, काटकसर ही तत्व त्यांनी सहकारात रुजवली आज ही तत्त्व देशाला दिशादर्शक ठरत आहेत. जीवनाच्या उत्तरार्धात त्यांनी दंडकारण्य अभियान राबवले. वाचनाची आवड असलेल्या दादांनी साहित्य क्षेत्रातही योगदान दिले. विविध क्षेत्रांचा मोठा अभ्यास असलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे संपूर्ण जीवन कार्य हे पुढील पिढ्यांसाठी सदैव मार्गदर्शक ठरणार असल्याच्या त्या म्हणाल्या.

तर ॲड.माधवराव कानवडे म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात ही सहकारातील संत होते. स्वच्छ आणि पारदर्शक जीवनाबरोबर त्यांचे व्यक्तिमत्व रुबाबदार होते. गोरगरिबांच्या जीवनात आनंद निर्माण करणे हाच त्यांच्या जीवनाचा ध्यास होता. या तालुक्याला हक्काचे पाणी त्यांनी मिळून दिले याचबरोबर निळवंडे धरणासाठी आग्रह त्यांनी धरला. आजारी असताना सुद्धा धरणाचे बांधकाम पाहण्यासाठी ते जात होते. विकासाची दूरदृष्टी व समाजाविषयाची तळमळ त्यांच्याकडे होती. याच तत्त्वांवर काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात काम करत असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी भाऊसाहेब शिंदे, विनोद हासे, विलास कवडे, रमेश गुंजाळ, ॲड.अशोक हजारे, डॉ. सुजित खिलारी, हौशीराम सोनवणे,  तुषार दिघे, शांताराम कढणे,विजय राहणे, चंद्रकांत कडलग, रोहिदास सानप, आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेअरमन बाबा ओहोळ यांनी केले.तर कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी आभार मानले. यावेळी अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed