सह्याद्री विद्यालयात श्यामची आई पुस्तकावर संवाद
संगमनेर । झुंझार न्यूज
स्वातंत्र्य सेनानी साने गुरुजी लिखित श्यामची आई हे पुस्तक सर्व विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे प्रत्येकाने जीवनामध्ये एकदा तरी श्यामची आई पुस्तक वाचणे गरजेचे असून पुस्तके हेच खरी संस्काराची शिदोरी असल्याचे प्रतिपादन निवृत्त नायक तहसीलदार तथा अभिवाचक अनिल सोमणी यांनी केले आहे.

सह्याद्री विद्यालय येथे आनंदी दिवस अंतर्गत श्यामची आई पुस्तकांवर विद्यार्थी संवाद झाला यावेळी ते बोलत होते या प्रसंगी अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा एस एम खेमनर हे होते. तर व्यासपीठावर ॲड प्रज्ञा समीर लामखडे, प्रा.बाबा खरात, अण्णासाहेब दिघे, मीनानाथ जोर्वेकर ,किरण आव्हाड, नामदेव कहांडळ उपस्थित होते.
यावेळी बोलताना अनिल सोमणी म्हणाले की, सह्याद्री विद्यालयाने सातत्याने विविध उपक्रम राबवले असून त्यामधून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडत आहे. सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे मात्र पुस्तके हीच खरी संस्कार देणारी शिदोरी आहे. मैदानी खेळ आणि पुस्तके ज्या विद्यार्थ्यांनी जपली ते मोठी झाली आहेत. पालकांनी सुद्धा घरामध्ये पुस्तके ठेवलीच पाहिजे.
श्यामची आई हे पुस्तक मराठी साहित्य विश्वा मधील अत्यंत महत्त्वाचे पुस्तक आहे. याचे वाचक विद्यार्थी शिक्षक किंवा प्रत्येकाने एकदा तरी केले पाहिजे. सोशल मीडिया मधून आलेली माहिती किंवा बोलून चालून मिळालेली माहिती माणूस विसरू शकतो मात्र वाचन केलेली कधी विसरत नाही. वाचणारे स्मरणशक्ती वाढते. वाचन चळवळ वाढवणे हे शिक्षण क्षेत्रासाठी मोठे आव्हान ठरले आहे आणि याकरता असे छोटे छोटे उपक्रम राबवून त्यामधून विद्यार्थ्यांमध्ये अभिरुची वाढवणे हा सह्याद्री विद्यालयाचा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे.
लोकनेते बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर हे शिक्षणाचे केंद्र झाले आहे. आता या मधून संस्काराधिष्ठित युवक आणि विद्यार्थी घडवण्यावर सह्याद्री विद्यालयाच्या माध्यमातून जे काम होत आहे ते इतरांसाठी अनुकरणीय असल्याचे ते म्हणाले
तर ॲड. प्रज्ञा लामखडे म्हणाल्या की, समाज माध्यमातून अनेक विकृत प्रवृत्ती निर्माण होत असून विद्यार्थिनींनी स्वसंरक्षणाची जबाबदारी घेतली पाहिजे. याचबरोबर स्वतःचे आरोग्य आणि बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी चिंतन मनन करणे अत्यंत गरजेचे आहे. यावेळी त्यांनी पोक्सो कायद्याची माहिती दिली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य एस एम खेमनर यांनी केले. सूत्रसंचालन किरण आव्हाड यांनी केले. तर मीनानाथ जोर्वेकर यांनी आभार मानले. यावेळी सह्याद्री विद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






