शिर्डी । झुंझार न्यूज
भारतीय राजकारणात अशी काही मोजकी व्यक्तिमत्त्वे असतात, जी आपल्या विचारधारेसोबतच आपल्या शैलीमुळे जनमानसात कायम चर्चेत राहतात. या यादीतील आघाडीचे नाव म्हणजे ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’चे (ए) अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त, एका सामान्य कार्यकर्त्यापासून ते दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचलेल्या या ‘सच्च्या जयभीमवाल्या’ नेत्याच्या प्रवासाचा घेतलेला हा आढावा.

दलित पँथर ते जननायक: संघर्षाची सुरुवात
रामदासआठवले यांची खरी जडणघडण ‘दलितपँथर’ चळवळीच्या मुशीत झाली. ऐंशीच्या दशकात जेव्हा ही चळवळ ऐन भरात होती, तेव्हा एक तडफदार, राज्यभर फिरणारा आणि कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी करणारा नेता म्हणून आठवले यांची ओळख निर्माण झाली. अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा आणि शोषितांचा आवाज बनलेला हा कार्यकर्ता पुढे जाऊन महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचा स्तंभ बनेल, याची चुणूक तेव्हाच दिसली होती. त्यांनी केवळ भाषणे केली नाहीत, तर खेड्यापाड्यात जाऊन दलित आणि बहुजन समाजाची मोट बांधली.

रामदास आठवले यांच्या राजकीय प्रवासावर अनेकांनी टीका केली. सुरुवातीला शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी असलेली त्यांची जवळीक सर्वश्रुत होती. मात्र, नंतरच्या काळात त्यांनी ज्या भारतीय जनता पक्षावर ते टीका करत होते, त्यांच्याशीच हातमिळवणी केली. यावरून त्यांच्यावर ‘राजकीय कोलांटउड्या’ मारल्याचा शिक्का बसला. परंतु, समर्थकांच्या मते, ही त्यांची ‘सत्ताकारण’ हाताळण्याची एक कला आहे. “ज्या सत्तेच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सुटू शकतात, तिथे राहणे” हा त्यांचा व्यावहारिक दृष्टिकोन राहिला आहे. आज ते केंद्रात सलग तिसऱ्यांदा मंत्री आहेत, हे त्यांच्या राजकीय दूरदृष्टीचेच प्रतीक आहे.
‘झिंदादिली’ आणि मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेली स्तुती
रामदासआठवले यांचा स्वभाव अत्यंत मनमोकळा आणि ‘अजातशत्रू’ असा आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून ते सर्वांशी मैत्री जपतात. एकदा एका मुलाखतीत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांना विचारले होते की, “माझ्यातला कोणता गुण तुम्हाला आवडतो?” त्यावर फडणवीस म्हणाले होते, “तुमची झिंदादिली आणि तुमच्या कविता मला खूप आवडतात.” हे उत्तर आठवलेंच्या व्यक्तिमत्वाचे नेमके वर्णन करते. कितीही गंभीर वातावरण असले तरी आपल्या हजरजबाबीपणाने ते वातावरण हलकेफुलके करण्याची ताकद त्यांच्यात आहे.

कविमनाचा ‘यमकबाज’ नेता
रामदास आठवले यांच्या भाषणाची सुरुवात आणि शेवट कवितांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. त्यांची कविता म्हणजे केवळ यमक जुळवणे नसते, तर त्यात एक प्रकारचा उपरोधिक विनोद आणि सामाजिक संदेश दडलेला असतो. सभेला कितीही उशीर झाला असला, तरी लोक आठवलेंच्या कवितेची वाट पाहत थांबतात.
त्यांच्या एका प्रसिद्ध कवितेत ते म्हणतात
“ज्यांनी दलितांसाठी केले होते आपले हौद खुले,
त्यांचं नाव होतं महात्मा फुले…
आता आम्ही राहिलो नाहीत खुळे,
कारण आम्हाला फुलवायचे आहेत बाबासाहेबांच्या समतेच्या विचारांचे मळे!”
अशा सोप्या शब्दांत ते बाबासाहेबांचे विचार आणि महापुरुषांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचवतात.

मंत्रिपदाची कला आणि जनसंपर्क
आठवले स्वतः म्हणतात त्याप्रमाणे, “मंत्रिपद कसे मिळवायचे, याची मला कला येते.” ही कला म्हणजे त्यांचा दांडगा जनसंपर्क आणि तळागाळातील लोकांचे पाठबळ. केंद्रात मंत्री असूनही ते आजही सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी सहज उपलब्ध असतात. सामाजिक न्याय मंत्रालयाच्या माध्यमातून त्यांनी दलित, ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या मागास घटकांसाठी अनेक योजना प्रभावीपणे राबवल्या आहेत.
रामदास आठवले हे केवळ एक राजकारणी नाहीत, तर ते एक ‘एन्टरटेनर’ आणि तितकेच संवेदनशील समाजसेवकही आहेत. ‘गोकोरोनागो’ सारख्या घोषणांमुळे ते जागतिक स्तरावर चर्चेत आले असले, तरी त्यांच्या राजकारणाचा पाया हा आंबेडकरी विचारांवर आधारलेला आहे. टीकाकारांना आपल्या कवितेतून निरुत्तर करणारे आणि मित्रांना आपल्या दिलदारपणाने जिंकणारे रामदास आठवले भारतीय राजकारणातील एक ‘रंगीत’ व्यक्तिमत्व आहे.

आज २५ डिसेबर त्यांच्या ६७ व्या (आणि पुढील सर्व) वर्षांच्या प्रवासाला शुभेच्छा देताना एवढेच म्हणावेसे वाटते

“राजकारणात कितीही आले झेंडे,
तरी आठवले साहेब आहेत सर्वात ‘धेंडे’!”
राजेश गायकवाड ( पत्रकार दैनिक पुढारी )
झुंझार न्यूज ( युटुबर / पोर्टल )
Post Views: 641






