संगमनेर । झुंझार न्यूज
“जंगले संपली तर जलसंपेल, जलसंपले तर शेती संपेल, शेती संपली तर माणूस संपेल, यासाठी वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन महत्त्वाचे आहे. थोडक्यात वसुंधरेचे संरक्षण आणि संवर्धन ही प्रत्येकाचीच नैतिक जबाबदारी आहे असे विचार दंडकारण्य अभियानाचे प्रचारक प्राध्यापक बाबा खरात यांनी ५ जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून विचार व्यक्त केले.

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले कि, थोर स्वातंत्र्य सेनानी स्व. भाऊसाहेब थोरात यांनी ६ जून 2006 रोजी दंडकारण्य चळवळीचा शुभारंभ केला. आज दंडकारण्य चळवळीने जन आंदोलनाचे स्वरूप धारण केले आहे. त्याचा परिणाम पर्यावरण संरक्षण व पर्यावरण संवर्धनास होत आहे. निसर्गाला जपले नाही तर निसर्ग आपल्याला संपवेल. वने जगली तर पशु पक्षी आणि प्राणी जगतील. जैविक साखळी अबाधित राहिली तर मनुष्य जगेल. मानव हाच पर्यावरणाचा एक कुशल घटक आहे. मात्र पर्यावरणाच्या प्रत्येक घटकात मानवी हस्तक्षेप वाढत चाललेला आहे. यासाठी आपले एकच ध्येय आहे. ते म्हणजे “झाडे लावा – झाडे जगवा”. साने गुरुजी म्हणतात, वृक्ष म्हणजे परमेश्वराचे हिरवे हात आहेत.
ज्या गावांना हे हिरवे हात कवटळतात त्या गावांना ते आशीर्वाद देतात. सुखशांती व चिरंतन कल्याणाचा वर देतात. आपल्या भावी पिढ्यांच्या उज्वल भविष्यासाठी हे हिरवे हाते न तोडता त्यांचे संगोपन केले पाहिजे. जागतिक तापमानात वाढ होत आहे. ऋतुमानात बदल होत आहे. राज्यातील वनक्षेत्रे 20% वरून 33% पर्यंत नेणे आवश्यक आहे. वाढते प्रदूषण ही एक समस्या आहे. पृथ्वीवरील प्रदूषण कमी करावयाचे असेल तर वनसंवर्धन झालेच पाहिजे. वने असतील तर शुद्ध हवा मिळेल. जमिनीतील पाण्याचा स्रोत वाढेल. पशुपक्षी प्राणी यांची संख्या वाढून जैविक समतोल राखला जाईल. निसर्गाचे देणे फेडण्यासाठी नव्या झाडांची लागवड केली पाहिजे. नैसर्गिक संपत्तीचा जपून वापर करण्याची शपथ सर्वांनी घेतली पाहिजे.
५ जून पर्यावरण दिन साजरा करताना सर्वांनी मिळून वृक्षलागवड व वृक्षसंकल्प हाती घेऊन सिद्धीस नेऊया असे आवाहनही यावेळी प्रा. बाबा खरात यांनी केले आहे.



