नाशिक – पुणे रेल्वे,बेरोजगारी, महिला सुरक्षा,नवीन उद्योग,आरोग्य यांसह उत्तर महाराष्ट्राच्या विकासाकरता महत्त्वपूर्ण मुद्दे

संगमनेर । झुंझार न्यूज

नव्या पिढीतील अभ्यासू आमदार म्हणून ओळख बनलेले आमदार सत्यजित तांबे यांनी मुंबई येथे झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात युवकांची बेरोजगारी, महिला सुरक्षा, नाशिक – पुणे रेल्वे, नवीन एमआयडीसी, वीजदर,शेतकऱ्यांचे प्रश्न,शिक्षण क्षेत्रातील प्रश्न, याचबरोबर उत्तर महाराष्ट्राच्या विविध प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी केली असून त्यांनी अधिवेशनात मांडलेल्या विविध विषयांची राज्यभर चर्चा झाली आहे.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या तत्व विचारांवर आणि लोकनेते माजीमंत्री बाळासाहेब थोरात व मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सत्यजित तांबे यांनी राज्यभर युवकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी मोठे काम केले आहे.विविध भाषांवरील प्रभुत्व, अभ्यासपूर्ण मांडणी, प्रश्नांचे आकलन आणि प्रश्न सोडवण्यासाठी चा पाठपुरावा याबाबत राज्यातील निवडक आमदारांमध्ये त्यांचा समावेश होत आहे.

मुंबई येथे झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 19 दिवसाच्या कामकाजा पैकी आमदार सत्यजित तांबे हे 17 दिवस उपस्थित राहिले. याचबरोबर 152 तारांकित प्रश्न त्यांनी मांडले. तर 35 लक्षवेधी सूचना केल्या. 6 सर्वसाधारण अर्धा तास चर्चा केल्या. तर 6 शासकीय ठराव मांडले. 18 औचित्याचे मुद्दे व 18 विशेष उल्लेख त्यांनी केले. याचबरोबर 6 अल्पकालीन चर्चा, 15 नियम 93 अन्वये सूचना आणि 14 पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन त्यांनी मांडल्या. अर्थसंकल्पीय चर्चेत सहभाग, लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत सहभाग, तारांकित प्रश्न व सत्तारूढ गट आणि विरोधी पक्षांच्या प्रस्तावावरील चर्चेत सहभाग विविध विधेयकांवरील चर्चेत त्यांचा सहभाग हा लक्षवेधी ठरला.


याचबरोबर या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये नाशिक – पुणे संगमनेर मार्गे रेल्वेचा मुद्दा त्यांनी प्रभावीपणे मांडला. याचबरोबर युवकांसाठी स्वतंत्र युवक कल्याण मंत्रालयाची मागणी केली. महिला व अनुसूचित जाती जमातीच्या आयोगाप्रमाणे राज्यातील तरुणांच्या प्रश्नांसाठी स्वतंत्र युवक आयोग असावा ही मागणी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली. याचबरोबर सरकारने 75 हजार लवकर भरतीची घोषणा करून ती प्रत्यक्षात पूर्ण झाली नाही त्यामुळे तातडीने ही भरती करावी अशी मागणी त्यांनी केली. पोलीस दलातील मनुष्यबळ, महिलांच्या सुरक्षेसाठी विविध ठिकाणी सीसीटीव्ही देखभाल,मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून सर्वसामान्य नागरिकांची होणारी फसवणूक, याचबरोबर संगमनेर आणि पारनेर तालुक्यात नवीन एमआयडीसी सुरू करण्याची मागणी त्यांनी केली.

महाराष्ट्रातील उद्योगांसाठी वीजदर देशात सर्वाधिक असल्याने गुजरात सारख्या इतर राज्यात हे उद्योग स्थलांतरित होत असल्याची चिंता व्यक्त करताना वीजदर समान ठेवावे अशी मागणी केली. तर उत्तर महाराष्ट्रात विदर्भ प्रमाणे उत्तर महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासासाठी ॲडवांटेज उत्तर महाराष्ट्र ही परिषद आयोजित करण्याची सूचना त्यांनी केली.

संगमनेर शहरामध्ये स्वतंत्र महिला रुग्णालयाची मंजुरी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकाळात झाली आहे. ती कार्यवाही तातडीने पूर्ण करावी अशी मागण्या करण्याबरोबर सिन्नर तालुक्यातील वावी येथे ट्रॉमा तातडीने सुरू करावे. याचबरोबर नवी मुंबई विमानतळावरील प्रवाशांच्या सुविधा, सायबर गुन्हे,वकील संरक्षण कायदा, कारागृह सुरक्षा कायदा, रोजगार निर्मिती कार्यक्रमात शेळी मेंढी पालन व्यवसायाचा समावेश अनाधिकृत प्री प्रायमरी शाळांवर कारवाईची मागणी यांसह उत्तर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यास समवेत विविध शासकीय कर्मचाऱ्यांचे प्रश्नही त्यांनी मांडले. अत्यंत महत्त्वपूर्ण विषयाबरोबर अभ्यासपूर्ण विश्लेषणातून सभागृहाची लक्ष त्यांनी वेधून घेताना प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठीच्या सूचनाही अत्यंत महत्त्वपूर्ण ठरल्या.

आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत मांडलेल्या विविध प्रश्नांच्या वेळी व चर्चेवेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह मंत्री व सदस्य उपस्थित असत. या प्रश्नांबाबत व केलेल्या विविध प्रश्नांच्या पाठपुराव्याबाबत राज्यातील सर्वसामान्य नागरिकांमधून त्यांच्या चांगल्या कामाचे कौतुक होत आहे.

सोशल मीडियावर आ.सत्यजित तांबे यांच्या भाषणाची धूम

तरुणाई मध्ये आमदार सत्यजित तांबे यांच्या भाषणाची मोठी क्रेझ असून त्यांनी विधान परिषदेमध्ये केलेल्या विविध भाषणांच्या व्हिडिओ सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर असून त्याला तरुणांमधून मोठी पसंती मिळत आहे.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *