पसायदान हे महाकाव्य मानवतेच्या कल्याणासाठी
सप्ताहाच्या माध्यमातून सर्व समाज एकत्र आणण्याचे वारकरी संप्रदायाचे वैशिष्ट्य
संगमनेर । झुंझार न्यूज
शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या वारकरी संप्रदायात सर्व समाज एकत्र येऊन अखंड हरिनाम सप्ताह करतात. सर्व समाजाला एकत्र आणण्याचे वैशिष्ट्य वारकरी संप्रदायाचे आहे. वारकरी संप्रदायाला मोठी संतपरंपरा आहे .संत ज्ञानेश्वरांचे पसायदान हे काव्य मानवतेच्या कल्याणासाठी असून सर्व समाजाला एकत्रित पुढे घेऊन जाणारा वारकरी संप्रदाय असल्याचे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

संगमनेर खुर्द येथे अखंड हरिनाम सप्ताह निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी हरिभक्त परायण कविराज महाराज झावरे यांचे किर्तन झाले .याप्रसंगी आर. एम. कातोरे , एस पी गोडसे, गणेश शिंदे, रमेश सुपेकर ,भगवान गोफणे ,दीपक भोर, दत्तात्रय खुळे, रोहिणी गुंजाळ, वैशाली सुपेकर, श्वेता मंडलिक, शैला भारती ,सुभाष पाटील गुंजाळ, राजेंद्र देशमुख, किसन सातपुते ,अमोल राजकुवर, उत्तम टपले,रमेश गुंजाळ, कैलास गुंजाळ, प्रसाद गुंजाळ, विलास आव्हाड ,संतोष माखरे , तरुण वर्ग व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की वारकरी संप्रदायामध्ये विविध जाती धर्म समाजातील अनेक संतांनी समतेचा विचार दिला. हा मानवतेचा विचार आहे. ज्ञानेश्वरी सारखे महाकाव्य लिहिणारे संत ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांना त्या काळात मोठा त्रास झाला. आई-वडिलांना आत्महत्या करावी लागली. त्यांनी लिहिलेले ज्ञानेश्वरी हे महाकाव्य व पसायदान हे संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी आहे सध्याच्या युद्धाच्या वातावरणामध्ये जगाला कोणते काव्य महत्वाचे तर पसायदान. सर्वांच्या जीवनामध्ये सुख आनंद मिळावा दृष्ट प्रवृत्ती नष्ट व्हावी हा विचार संत ज्ञानेश्वर यांनी दिला. या संत मांदियाळीत संत तुकाराम, संत चोखोबा ,संत गोरा कुंभार, संत नामदेव, एकनाथ ,नरहरी सोनार, असे अठरापगड समाजातील संत होऊन गेले.
संत चोखामळा हे मागासवर्गीय समाजातील होते . पण अभीर गुलाल उधळीत रंग हा त्यांचा अभंग अत्यंत सुंदर आहे .त्यांच्या पत्नी सोयराबाई यांनी लिहिलेला अवघा रंग एक झाला हा अभंग, अशी कितीतरी काव्य मानवतेचे वर्णन करणारे आहेत.
वारकरी संप्रदाय हा मानवतेचा धर्म सांगणार असून सगळे समाज व जाती धर्म यांना बरोबर घेऊन जाणार आहे. यामध्ये कधीही भेदभाव नाही .अंगारे, धुपारे, गंडे , तोडे, आणि बुवाबाजीला थारा नाही.
म्हणून हा विचार आपल्याला जपायचं असून सर्वांना पुढे न्यायचा असल्याचे लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
तर ह भ प कविराज महाराज झावरे म्हणाले की वारकरी संप्रदायाचा विचार पुढे नेणारे लोकनेते बाळासाहेब थोरात हे आहेत. सर्वांना सामावून घेत त्यांनी संगमनेर तालुका हा राज्यामध्ये अव्वल बनवला आहे. प्रत्येकाने आपल्या क्षेत्रामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे काम करून ईश्वराची सेवा करावी असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी गावकऱ्यांच्या वतीने लोकनेते बाळासाहेब थोरात यांचा सन्मान सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी संगमनेर खुर्द मधील नागरिक महिला युवक यांच्यासह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
