रामराव महाराज ढोक यांची रामायण कथा हा अमृत योग – मा.मंत्री बाळासाहेब थोरात
अल निनो चा प्रभाव कमी होऊन सर्वत्र चांगला पाऊस होवो ; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची ईश्वरचरणी प्रार्थना
संगमनेर । झुंझार न्यूज
ह.भ.प.रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांनी मागील 40 वर्षात राज्यात आणि देशात आपल्या श्रवणीय वाणीतून रामायण कथा सांगितली आहे. त्यांची रामायण कथा ऐकणे हा अमृत योग असून गगनगिरी महाराजांचा सप्ताह अत्यंत भव्य दिव्य आणि अभूतपूर्व होत आहे. यावर्षी अलनिनोचा प्रभाव कमी होऊन सर्वत्र चांगला पाऊस होऊन शेतकरी व नागरिक सुखी समाधानी होऊ दे अशी प्रार्थना यावेळी राज्याचे माजी महसूल व कृषीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज व परमेश्वराकडे केली.
गुंजाळवाडी येथे सुरू असलेल्या परमपूज्य विश्व विभूषित स्वामी गगनगिरी महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताह रामायण कथेला उपस्थित राहून त्यांनी आरती केली यावेळी ते बोलत होते. यावेळी रामायणाचार्य हरिभक्त परायण रामराव महाराज ढोक, आमदार सत्यजित तांबे, नगराध्यक्ष डॉ.मैथिलीताई तांबे, आयोजक आबासाहेब थोरात, दिलीपराव शिंदे,कपिल पवार यांच्यासह राजेंद्र गुंजाळ, हेमंत राजे पवार, नवनाथ आरगडे, सरपंच अमोल गुंजाळ, यांच्यासह संगमनेर तालुक्यातील विविध मान्यवर व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजीमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, हरिभक्त परायण रामराव महाराज ढोक यांच्या सुश्राव्यवाणीतून राम कथा ऐकणे हा अमृत योग आहे. महाराजांनी मागील 40 वर्षात देशात आणि राज्यांमध्ये विविध ठिकाणी रामायण कथेच्या माध्यमातून अध्यात्मिक सेवा केली आहे. वाणीवर प्रभुत्व आणि सहजपणे सांगण्याची पद्धत यामुळे कितीही वेळा रामायण ऐकले तरी पुन्हा प्रत्येकाला ऐकावे वाटते. प्रत्येकाच्या मनात घर करून ते राहते.
गुंजाळवाडीच्या परिसरामध्ये अत्यंत भव्य दिव्य पद्धतीने गगनगिरी महाराज यांच्या आठव्या सप्ताहाचे आयोजन होत असून सर्व आयोजक कार्यकर्त्यांचे अभिनंदन आहे. अत्यंत उत्कृष्ट व्यवस्था सर्व भाविकांची केली आहे. हे एक आनंदाचे पर्व आहे. या आध्यात्मिक आनंदाचा अनुभूती सर्वांनी घ्यावी.
याचबरोबर यावर्षी अलनिनोचा प्रभाव असल्याने पाऊस कमी पडतो की काय अशी भीती निर्माण झाली आहे. पावसाळा सुरू झाला आहे अद्याप पाऊस नाही. मात्र ईश्वराच्या आशीर्वादाने अलनिनोचा प्रभाव कमी होऊन संपूर्ण राज्यात व देशात चांगला भरपूर पाऊस पडू दे. शेतकरी व सर्वसामान्य नागरिक सुखी होऊ दे. अशी प्रार्थना त्यांनी गगनगिरी महाराज व ईश्वराकडे केली असून कारण पाऊस पडला तर सर्व सुखी समाधानी असतात असे ते म्हणाले.
तर हरिभक्त परायण रामराव महाराज ढोक म्हणाले की, संगमनेर तालुक्यामध्ये रामायण कथेची सुरुवात ही लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी 35 वर्षांपूर्वी सुरू केली. यावेळी त्यांनी आपल्या श्रवणीय वाणीतून राम कथेचे निरूपण केले.
तर आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, रामराव महाराज ढोक हे अत्यंत साध्या सोप्या आणि सर्वांना समजेल अशा भाषेमध्ये रामायण सांगतात त्यामुळे ते सर्वांना फार आवडते.
यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते परमपूज्य गगनगिरी जी महाराज यांची आरती करण्यात आली. अत्यंत मोठ्या संख्येने भाविक भक्तगण यावेळी उपस्थित होते.
