राजकारण बाजूला ठेवण्याचे सरकारला केले आवाहन
संगमनेर । झुंझार न्यूज
शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आमदार रोहित पवार यांनी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. सरकारने या आंदोलनाकडे राजकीय चष्म्यातून न पाहता राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करून त्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी करताना काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी रोहित पवार यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी याकरता अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनाला पाठिंबा देताना महाराष्ट्राचे माजी महसूल व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे की, सरकारने या आंदोलनाकडे राजकीय चष्म्यातून पाहू नये. निवडणुकी काळामध्ये सरकारने कर्जमाफीच्या घोषणा केल्या होत्या. सरसकट कर्जमाफी करण्याचे आश्वासने दिली होती. दीड वर्ष उलटून गेल्यानंतरही कोणतीही कार्यवाही होत नाही. सध्या जाहीर केलेली कर्जमाफी ही अत्यंत तुटपुंजी आणि जाचक अटी असलेली आहे.
याउलट महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये पहिल्याच कॅबिनेट बैठकीमध्ये दोन लाखापर्यंतची सरसकट कर्जमाफी व नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50 हजारांची अनुदान दिले होते.
शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून तो काय अडचणीत आहे. त्याला मदत करणे ही सरकारची पहिली जबाबदारी आहे. त्यामुळे सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सरसकट कर्जमाफी जाहीर केली पाहिजे. याचबरोबर कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा सातबारा पूर्णपणे कोरा केला पाहिजे.

आ.रोहित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेशी आपण सहमत असून सरकारने या विषयावर तातडीने आपली भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे. सरसकट कर्जमाफी शिवाय आता पर्याय नाही. हे सरकारने लक्षात घ्यावे असे आवाहनही त्यांनी केले आहे .
याचबरोबर अलनिनोच्या संकटामुळे कमी पावसाची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे अत्यंत गरजेचे असून राजकारण बाजूला ठेवून सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करून सातबारा कोरा करत दिलासा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. व आ. रोहित पवार यांनी पंढरपूर येथे सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

