मुंबई । झुंझार न्यूज
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. लोकसभेत दोन तृतीयांश बहुमतासाठी भाजपने ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे गटाचे खासदार फोडले, त्यानंतर आता ज्येष्ठ नेते शरद पवार सावध झाले आहेत. आपला गट सुरक्षित ठेवण्यासाठी पवार आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (सपा) काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याच्या तयारीत असल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे. मात्र, पक्षातील काही खासदारांच्या परस्परविरोधी मतांमुळे या निर्णयाला विलंब होत असल्याचे समजते.

‘ऑपरेशन टायगर’नंतर आता ‘ऑपरेशन तुतारी’ची भीती?
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदार आपल्या बाजूने वळवले. हे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्यानंतर आता भाजपचे लक्ष शरद पवार यांच्या गटावर असल्याचे बोलले जात आहे. शरद पवार गटाकडे सध्या ८ खासदार आणि १० आमदार आहेत. यातील काही लोक फुटू नयेत आणि तांत्रिकदृष्ट्या गट सुरक्षित राहावा, यासाठी विलीनीकरणाचा पर्याय समोर आला आहे.

काँग्रेसमध्ये विलीनीकरण कशासाठी?
शरद पवार यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष विचारांची जपणूक केली आहे. पंतप्रधान मोदींसोबत त्यांचे वैयक्तिक संबंध चांगले असले तरी, त्यांनी भाजपसोबत जाण्याचे अनेक प्रस्ताव यापूर्वी नाकारले आहेत. वयाच्या या टप्प्यावर भाजपसोबत गेल्याचा ठपका त्यांना नको आहे. त्यामुळेच नैसर्गिक मित्रपक्ष म्हणून काँग्रेसमध्ये विलीन होणे त्यांना अधिक श्रेयस्कर वाटत आहे. काँग्रेसनेही यापूर्वी असा प्रस्ताव दिला होता आणि विलीनीकरणामुळे दोन्ही पक्षांची ताकद वाढणार आहे.

खासदारांमध्ये मतभेद: सत्तेचा ओढा की अस्तित्वाची लढाई?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार विलीनीकरणासाठी अनुकूल असले तरी त्यांच्या काही खासदारांची भूमिका वेगळी आहे.
-
एक गट: या खासदारांना वाटते की जर पक्ष बदलायचाच असेल, तर तो काँग्रेसमध्ये विलीन करण्यापेक्षा सत्ताधारी शिंदे गट किंवा भाजपसोबत जाणे अधिक फायदेशीर ठरेल. यामुळे मतदारसंघाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होईल.
-
दुसरा गट: हा गट पवारांच्या विचारांशी ठाम असून काँग्रेसमध्ये जाण्यास तयार आहे.
पक्षातील या दोन टोकाच्या भूमिकांमुळे पवारांसमोर मोठा पेच निर्माण झाला असून, निर्णय प्रक्रियेत विलंब होत आहे.

एक काळ असा होता की राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येतील अशी चर्चा होती. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. अजित पवार गटाचे नेतृत्व आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे आहे. या गटातील अनेक नेत्यांचा शरद पवारांसोबत पुन्हा जाण्यास विरोध आहे. तसेच भाजपचे केंद्रीय नेतृत्वही हे दोन्ही गट एकत्र येऊ देणार नाही, अशी चिन्हे आहेत.
शरद पवार गटाने काँग्रेससमोर विलीनीकरणासाठी काही महत्त्वाच्या अटी ठेवल्याचे समजते. यात प्रामुख्याने:
१. विद्यमान आमदार आणि खासदारांचे मतदारसंघ आगामी निवडणुकीत अबाधित राहावेत.
२. राष्ट्रीय स्तराप्रमाणेच राज्यातही त्यांना योग्य प्रतिनिधित्व मिळावे.


