दोन महिन्यांत लाखोंचे नुकसान , सात्रळ, माळेवाडी, डुक्रेवाडी परिसरातील शेतकरी भयभीत
पोलिसांकडे तातडीच्या कारवाईची मागणी
झरेकाठी । झुंझार न्यूज
राहुरी तालुक्यातील सात्रळ, माळेवाडी व डुक्रेवाडी परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून विहिरीवरील विद्युत मोटारी, सोलर मोटारी तसेच विद्युत केबल चोरीच्या घटनांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. सातत्याने होत असलेल्या या चोऱ्यांमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून खरीप हंगामाच्या तोंडावर सिंचन व्यवस्थाच विस्कळीत झाली आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी पोलिसांनी तातडीने चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी केली आहे.
सात्रळ परिसरातील संपत धोंडीराम कडू यांच्या गट नंबर ३६८ व दि४/८२०२६रोजी विठ्ठल मोहन कडू,आबासाहेब मोहन कडू यांच्या देखील मोटरीची केबल चोरीस गेले आहेत . अनेक शेतकऱ्यांच्या विहिरींवरील केबल चोरीला शेतातील सोलर मोटरच्या केबल व इलेक्ट्रिक मोटर पंप सह चोरट्यांनी लंपास केले आहेत .
चोरी झाल्यानंतर नवीन केबल बसविण्यासाठी शेतकऱ्यांना आठ ते दहा हजार रुपये खर्च करावे लागत आहेत. मोटार चोरीला गेल्यास वीस ते पंचवीस हजार रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागत आहे. आधीच वाढलेला शेतीचा उत्पादन खर्च, अनियमित पाऊस आणि आर्थिक अडचणी यामुळे शेतकरी संकटात असताना या चोऱ्यांनी त्यांच्या अडचणीत भर पडली आहे.
खरीप हंगाम सुरू असल्याने सिंचनासाठी अखंड वीजपुरवठा आणि मोटारी आवश्यक आहेत. मात्र केबल चोरीमुळे पाणीपुरवठा खंडित होत असून पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिसरात बिबट्याचा वावर असल्याने शेतकऱ्यांना रात्रभर शेतात पहारा द्यावा लागत असून चोरीच्या भीतीमुळे त्यांच्यात असुरक्षिततेची भावना वाढली आहे.
या घटनांबाबत संपत भाऊसाहेब कडू यांनी दिनांक ४/ ८/ २०२६ रोजी राहुरी पोलीस स्टेशन येथे स्वतः समक्ष हजर राहून अज्ञात व्यक्तीविरुद्ध फिर्याद दाखल .दिली आहेत. पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस करत आहेत, अनेक वेळा राहुरी पोलिसांना माहिती देण्यात आली असूनही चोरट्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. वाढत्या चोऱ्यांचा तपास करून आरोपींना तातडीने अटक करावी, रात्रीची गस्त वाढवावी आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मालमत्तेचे संरक्षण करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते बलराज पाटील व शेतकरी वर्गाने दिला आहे.
सामाजिक कार्यकर्ते प्रतिक्रिया
“विहिरीवरील केबल चोरी गेल्यामुळे केवळ आर्थिक नुकसान होत नाही, तर खरीप हंगामात सिंचन व्यवस्था ठप्प होते. पोलिसांनी या टोळीचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करावी.”