ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांचे कीर्तनातून समाज प्रबोधन
आश्वी । झुंझार न्यूज
संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे ग्रामदैवत श्री काशाई माता यात्रा उत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न झाली. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांनी गावातील वातावरण चैतन्यमय झाले होते. या यात्रोत्सवाचे मुख्य आकर्षण ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांचे कीर्तन ठरले, ज्यातून त्यांनी समाजाला आणि विशेषतः तरुण पिढीला मौलिक संदेश दिला.
कीर्तनाच्या माध्यमातून ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांनी आजची तरुण पिढी व्यसनांच्या आहारी जात असल्याबद्दल चिंता व्यक्त करत महाराज म्हणाले की, “तरुणांनी व्यसनांच्या विळख्यातून बाहेर पडून आपल्या आरोग्याकडे आणि करिअरकडे लक्ष दिले पाहिजे. व्यसनामुळे केवळ व्यक्तीचेच नाही तर संपूर्ण कुटुंबाचे नुकसान होते. त्यामुळे तरुणांनी सुसंस्कृत जीवन जगून आदर्श समाज घडवण्यासाठी पुढाकार घ्यावा.
याप्रसंगी आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी सौ. निलमताई खताळ म्हणाल्या की, मुलांना केवळ शिक्षण देऊन थांबू नका, तर त्यांना जीवनातील संघर्षाला सामोरे जाण्यासाठी, म्हणजेच लढायला शिकवा. हीच मुले उद्याची भावी पिढी असून देशाचे भविष्य त्यांच्या हातात आहे. तसेच, श्रावण महिन्याचे महत्त्व अधोरेखित करताना त्या म्हणाल्या की, श्रावण महिन्यापासून महिलांचे धार्मिक दिवस सुरू होतात. आतापासून थेट दिवाळीपर्यंत स्त्री धार्मिक कार्यात आणि सण-उत्सवात मग्न असते, जे आपल्या संस्कृतीचे प्रतीक आहे.
यावेळी सरपंच सौ. शशीकला पवार, दत्तू आहेर, माजी सरपंच रायभान पवार, शिवाजी आहेर, संजय गायकवाड, बाळू लहानू गायकवाड, बाळू कृष्ण गायकवाड, अरुण टपाल, बाळू गजानन गायकवाड, संदिप उंबाडे, भाऊसाहेब गायकवाड, विशाल बाजीराव, अक्षय विश्वास, विकास पवार, विकास गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यात्रा उत्सवाच्या निमित्ताने काशाई मातेची महापूजा व विविध धार्मिक विधी पार पडले. तर भाविकांनी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. हा उत्सव यशस्वी करण्यासाठी काशाई व जयभीम तरुण मंडळाने परिश्रम घेतले.