कोपरगांव । झुंजार न्यूज

संत आणि नदी आपला रस्ता कधीच सांगत नाही ते स्वमार्गातुन इतरांना नेहमीच प्रेरणा देत असतात तद्वत ब्रम्हलिन संत रामदासीबाबा यांनी कोकमठाण पंचक्रोशीवासियांना अध्यात्माची उर्जा दिली आहे. हल्लीच्या तरूणाईने डीजे पुढे नाचण्यापेक्षा हरिपाठाचा ध्यास घेत नामस्मरणाची पुंजी वाढवावी असे प्रतिपादन मुक्ताई ज्ञानपिठ पुणतांबाचे ह.भ.प. उत्तम महाराज गाडे यांनी केले.
           
तालुक्यातील श्रीक्षेत्र कोकमठाण येथील ब्रम्हलिन संत रामदासीबाबा यांच्या चौतीसावा पुण्यतिथी सोहळयास रविवारी प्रारंभ झाला त्याचे पहिले किर्तन पुष्प गुंफतांना ते बोलत होते. याप्रसंगी ह. भ. प. सोमेश्वरगिरी, जुना पंचदशनाम आखाडा त्रंबकेश्वरचे अजीवन ठाणाधिपती ह.भ.प. भागवतानंदगिरी महाराज, ह. भ. प. रामदास महाराज वाघ पंचक्रोशीतील भजनी मंडळे आदि उपस्थित होते.
           
या किर्तन सोहळयास राहाता येथील ह.भ.प. संतोष महाराज दिक्षीत संचलित नादब्रम्ह वारकरी शिक्षण संस्थेच्या चिमुकल्या मुलांनी तालबध्द साथ देत उपस्थित भाविकांची मने जिंकली.
             
ह.भ.प. उत्तम महाराज गाडे पुढे म्हणाले की, मनुष्याची श्रीमंती त्याच्या पैशातुन नव्हे तर वागण्यातुन समजते. रामनामात प्रचंड ताकद असुन श्रीलंकेत सीतेच्या शोधासाठी त्याच नामस्मरणांतुन रामसेतु उभा राहिला. कलियुगात तुमच्याकडे किती पैशांची पुंजी आहे यापेक्षा मृत्युपश्चात किती रामनामाचा साठा आहे याचीच मोजदाद होते. दुस-याचे कधीच वाईट करू नका, सत्मार्गाने धनदौलत मिळवा, चांगल्यांच्या संगतीत राहुन चांगले विचार आत्मसात करा, पैशाने कधीच सुख मिळत नाही, ज्ञानेश्वरी, तुकारामगाथा, गीता वाचनातुन मनुष्याला जीवनाचा खरा अर्थ समजतो, आपल्या मुलामुलींना भ्रमणध्वनीपेक्षा वारकरी अध्यात्माची शिकवण द्या, अभासी दुनियेत जगु नका, त्याच्या मोह मायेतुन भले भले लयाला गेले आहेत यासाठी संत सत्संग प्रत्येकाच्या जीवनांत महत्वाचा आहे. संत उगाचच भेटत नाही त्यांच्याकडुन जीवनाचे सार समजुन घ्या असेही ते म्हणाले. रामदासीबाबा समाधी मंदिरासह हेमाडपंथी महादेव, मुदगुलेश्वर, दक्षिणगंगा गोदावरी अहिल्या घाट, तीनखणी मंदिरावर मनमोहक विद्युत रोषणाई करण्यांत आली होती
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *