नगर । झुंजार न्यूज
अहमदनगर, ता. ३ः आंबेडकरी जनता स्वाभिमानी असून, स्वतःचे अस्तित्व या निवडणुकीत दाखवणार आहे. रिपाइंचे उमेदवार निवडून येणार नसले, तरी पाडण्याची ताकद कार्यकर्त्यांमध्ये आहे. आरपीआयला उमेदवारी नाकारून आंबेडकरी चळवळ मोडीत काढण्याचा घाट घातला गेला आहे, असा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव यांनी केला.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाने लोकसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून मागणी केलेल्या शिर्डी व सोलापूरच्या जागांपासून डावलण्यात आले. या पार्श्वभूमीवर शहराच्या टिळक रोड येथील श्रमिक कार्यालयात संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव व राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये निर्धार बैठक पार पडली. अजय साळवे अध्यक्षस्थानी होते. राज्य सचिव दीपक गायकवाड, राजाभाऊ कापसे, भीमराज बागूल, सुरेंद्र थोरात, संजय भैलुमे, युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

महत्त्वाचे निर्णय
महायुतीकडून स्वाभिमानाने सत्तेत वाटा देण्याची हमी मिळत नाही, तोपर्यंत सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते निवडणुकीत महायुतीचे काम न करता, तटस्थ राहण्याची भूमिका घेणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. दोन्ही मतदारसंघातून उमेदवार उभे करण्याची भूमिका पदाधिकाऱ्यांनी मांडली असून, त्या पार्श्वभूमीवर जिल्हा व्यापी दौरे व मेळावे घेण्याचेही या बैठकीत जाहीर करण्यात आले
