शिर्डी । झुंजार न्यूज

उन्हाळ्यात आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात. पोटाच्या समस्या जास्त आहेत. अशात पोट थंड ठेवणं फार गरजेचं असतं. त्यासाठी लोक वेगवेगळी उपाय करतात. आम्हीही आज तुम्हाला दोन खास उपाय सांगणार आहोत. आयुर्वेद वाचस्पति वैद्य परीक्षित शेवडे यांनी सांगितलं की, या दिवसांमध्ये शरीर थंड ठेवण्यासाठी धणे जिरे पाणी आणि वाळ्याची जुडी फाय फायदेशीर ठरते. सोबत यांचा वापर करताना काय काळजी घ्यावी हेही सांगितलं.

धणे-जिरे पाण्याचे फायदे , पोटातील जळजळ दूर होते 

उन्हाळ्यात जर तुम्ही रोज धणे व जिऱ्याचं पाणी प्याल तर पोटातील जळजळ कमी करण्यास मदत मिळते. या दोन्ही मसाल्यांमध्ये असलेल्या अॅंटी-ऑक्सीडेंट गुणांमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि सोबतच शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघण्यास मदत मिळते. पोट थंड राहतं आणि आराम मिळतो.

लघवीची जळजळ होईल कमी

उन्हाळ्यात बऱ्याच लोकांना लघवी करताना जळजळ होते. याची कारणे वेगवेगळी असू शकतात. तसं तर लघवी करताना जळजळ होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. पण जर घरी धणे आणि जिऱ्याचं पाणी प्याल तर लघवी करतानाची जळजळ कमी होऊ शकते. 

पित्त शांत होतं

ज्या लोकांना पित्तासंबंधी समस्या असेल त्यांचं उन्हाळ्यात पित्त वाढू लागतं. अशात त्यांना अॅसिडिटी, लाल चट्टे आणि खाजेची समस्या होऊ शकते. अशात धणे आणि जिऱ्याचं पाणी प्यायल्याने ही समस्या दूर होण्यास मदत मिळते. उन्हाळ्यात रोज धणे आणि जिऱ्याचं पाणी प्याल तर याने पित्तामध्ये संतुलन राहतं.

वाळा घातलेल्या पाण्याचे फायदे

उन्हाळ्यात जास्तीत जास्त लोक मडक्यातील पाण्यात वाळा टाकतात. याने सुगंधही चांगला येतो आणि आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. यात  मोठ्या प्रमाणात अॅंटी-ऑक्सिडंट असतात. शिवाय या पाण्यामुळे तुमची रोग प्रतिकार शक्ती वाढते. तसंच फ्री रेडिकल्सपासून होणारं शरीरातील उती, पेशी आणि अवयवांचे नुकसान टाळता येतं. वाळ्यात मोठया प्रमाणावर झिंक असल्याने तुमच्या डोळ्यांना थंडावा मिळतो आणि डोळ्यांच्या समस्या आणि जळजळ कमी होते. शिवाय वाळ्यामध्ये लोह, मॅंगनीज आणि व्हिटॅमिन बीदेखील असतं, ज्यामुळे तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण सुधारतं आणि रक्तदाब नियंत्रित होतो. रक्तदाब नियंत्रित झाल्यामुळे ह्रदयाचे कार्य सुरळीत होते. त्वचेचा पोत सुधारल्यामुळे उन्हाळ्यातही तुम्ही टवटवीत दिसता. एवढंच नाही तर या काळात वारंवार होणारं युटीआय अथवा मूत्रमार्गातील इनफेक्शन टाळण्यासाठी, तीव्र ताप कमी करण्यासाठी वाळ्याचं पाणी खूप फायदेशीर ठरतं. 

कसं बनवाल धणे-जिऱ्याचं पाणी?

धणे आणि जिऱ्याचं पाणी बनवण्यासाठी तुम्ही सगळ्यात आधी एक चमचा धणे पावडर आणि एक चमचा जिरे पावडर घ्या. हे एक ग्लास पाण्यात टाका. हे पाणी थोड्या वेळासाठी उकडून घ्या आणि नंतर गाळून या पाण्याचं सेवन करा. रोज सकाळी याचं सेवन केल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळतील. हा उपाय करण्याआधी एकदा डॉक्टर किंवा आयुर्वेदिक एक्सपर्टचा सल्ला घ्यावा.

काय घ्यावी काळजी?

आयुर्वेद वाचस्पति वैद्य परीक्षित शेवडे यांनी एका पोस्टमध्ये सांगितलं की, तापमानातली वाढ पाहता; शरीराला थंड ठेवण्यासाठी सगळ्यात सोपी, प्रभावी आणि अन्य कोणतेही दुष्परिणाम न करणारे दोन मार्ग म्हणजे धणे जिरे पाणी आणि वाळ्याची जुडी घातलेले पाणी. 

घ्यायची काळजी; 

१. रात्रभर धणे जिरे भिजत घालू नयेत. जेमतेम पाऊण एक तास भिजवून ते पाणी गाळून घ्यावे. (प्रमाण हे अनुभवानुसार ठेवावे.)

२. वाळ्याच्या जुडीचा दोरा सोडवून मग वापर करावा. आठवड्यातून एकदा जुडीला ऊन दाखवावे. 

वरील दोन्ही उपायांनी सब्जासारख्या अन्य उपायांसारखा भूक कमी होणे, सर्दी होणे वगैरे दुष्परिणाम दिसत नाही हे विशेष”

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *