संगमनेर । झुंजार न्यूज
म्हाळुंगी नदीवरील खचलेला पूल तोडण्याच्या कामाला अखेर मुर्हत मिळाला. सुधारीत अंदापत्रकानुसार सुमारे साडेपाच कोटी रुपये खर्चुन नवीन पुलाचे बांधकाम वर्षभरात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. मात्र प्रत्यक्षात कामास झालेला विलंब पाहता मुदतीत काम पूर्ण होण्याची शक्यता धूसर होईल, असे बोलले जाते.

दोन वर्षापूर्वी ऑक्टोबर २०२२मध्ये म्हाळुगी नदिवरील पुल खचला होता. त्यामुळे नागरीकांसह विद्यार्थ्यांचीही गैरसोय होत होती. दोन वर्षांपासून पालिकेवर प्रशासक असल्याने पुलाचे बांधकाम रखडले. त्यातच राज्यात सत्तांतर झाल्याने त्याचीही झळ कामाला बसली. असुविधेमुळे परिसरातील नागरीक संघटीत होवून कृती समितीही स्थापन झाली.

पुढे पुलाच्या बांधकामासाठी आंदोलने झाली, मात्र त्यालाही राजकीय वास लागला. आगामी नगरपालिका निवडणुकीची किनार त्याला होती. व्यापारी संकुलाचा निधी वळवत त्यातून पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले. सात कोटीतील साडेचार कोटीचा पूल आणि साडेतीन कोटी रस्त्यांसाठी मंजूर करण्यात आले.

त्याला झालेला विलंब पाहता पुलाच्या बांधकामाचा खर्च सव्वा कोटीने वाढला. त्याची तरतूद करताना मोठा विलंब झाला. ही तरतूद होत नाही तोच संगमनेर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्याचा प्रश्नाने डोके वर काढले.

कृती समितीने आंदोलनाची हाक देताच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जानेवारीत पुलाचे भूमिपूजन करण्यात आले अन् कार्यारंभ
आदेशही त्याचवेळी दिला गेला. आता हा पूल पाडण्याचे काम सुरू असून लवकरच नव्याने पूल बांधला जाणार
पुलाच्या बांधकामासाठी जानेवारीतच कार्यारंभ आदेश देण्यात आलेला आहे. मात्र जलवाहिन्या स्थलांतर करण्यास विलंब झाला. परिणामी उशिराने काम सुरू झाले. उन्हाळ्यातील पाणी टंचाई पाहता जलवाहिन्या स्थलांतरीत करणे जोखमीचे होते. स्थलांतरामुळे पाणीपुरवठा खंडितचा धोका होता. वर्षभरात नवीन पूल उभा राहिला यादृष्टीने गती दिली जाईल.
– राहुल वाघ, मुख्याधिकारी, नगरपालिका, संगमनेर,
