अकोले | झुंजार न्यूज
निळवंडे धरणातून शनिवारी (दि. 10 ऑगस्ट) उच्चस्तरीय कालव्यांसह डाव्या आणि उजव्या कालव्यांचे पूजन करुन पाणी सोडण्यात आले. ओव्हरफ्लोच्या पाण्याचा लाभक्षेत्रातील शेतकर्यांना प्रथमच लाभ होत आहे, ही अतिशय समाधानाची बाब आहे. लाभक्षेत्रातील शेवटच्या शेतकर्याला पाणी मिळेल असे नियोजन करण्याच्या सूचना महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांना दिल्या आहेत.
निळवंडे धरण स्थळावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत जलपूजन करण्यात आले. यावेळी माजी आमदार वैभव पिचड, अगस्ति कारखान्याचे अध्यक्ष सीताराम गायकर, भाजप तालुकाध्यक्ष यशवंत आभाळे, अगस्ति कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र डावरे, अमृतसागर दूध संघाचे संचालक जगन देशमुख, अगस्ति पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक देशमुख, संगमनेर तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, उपअभियंता श्री. चोपडे, अभिजीत देशमुख आणि लाभक्षेत्रातील शेतकरी उपस्थित होते.

मागील आठवड्यात धरणाच्या पाणलोटक्षेत्रामध्ये पावसाने चांगली हजेरी लावल्याने निळवंडे धरणातून ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला होता. ओव्हरफ्लोचे पाणी कालव्यांना सोडावे अशा सूचना पालकमंत्री विखे पाटील यांनी दिल्या होत्या. शुक्रवारी संगमनेर येथील कार्यक्रमामध्ये कालव्यांना शनिवारीच पाणी सोडण्याची ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली होती. त्याप्रमाणे धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले असून, उच्चस्तरीय कालव्यातूनही पाणी सोडण्याच्या सूचना त्यांनी अधिकार्यांना दिल्या आहेत.

यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचे लोकार्पण झाले. पाण्याची चाचणी घेण्यात आली. आज धरणातून कालव्यांमध्ये पाणी सोडण्याचा हा आनंददायी क्षण आहे. ओव्हरफ्लोचे पाणी प्रथमच सोडण्यात येत असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. निळवंडे प्रकल्पाचा एकत्रित आढावाही त्यांनी अधिकार्यांकडून घेतला. शेतकर्यांना पाणी मिळेल यासाठी सर्व उपाययोजना सुरु करण्याचे निर्देश त्यांनी दिले असून, बंदिस्त नलिका वितरण प्रणालीच्या कामासाठी जलसंपदा विभागाने निविदा काढली असून, संपूर्ण लाभक्षेत्रासाठी बंदिस्त नलिका वितरण प्रणालीतून पाणी देण्याचा निर्णय झाला असल्याचे विभागाच्यावतीने सांगण्यात आले. यामुळे शेतकर्यांना शाश्वत पाणी पुरवठा होवू शकेल”


