दूध संघाची 47 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमळीत संपन्न
संगमनेर l झुंजार न्यूज
प्रतिकूल परिस्थिती असलेल्या संगमनेर तालुक्यात विकासातून मोठी समृद्धी निर्माण झाली आहे. दूध व्यवसाय हा मुख्य व्यवसाय झाला असून तालुक्यात दररोज सात लाख लिटर दूध उत्पादन होत आहे. गोरगरीब व सर्वसामान्य माणसांच्या जीवनात आनंद निर्माण करणारा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ राज्यात प्रथम क्रमांकाचा असल्याचे गौरवउद्गार काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा राष्ट्रीय कमिटीचे सदस्य आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.

संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या 47 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे बोलत होते अध्यक्षस्थानी चेअरमन रणजीतसिंह देशमुख हे होते .तर व्यासपीठावर मा. आ. डॉ. सुधीर तांबे, बाजीराव पा. खेमनर ,ॲड माधवराव कानवडे, सौ दुर्गाताई तांबे, युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ जयश्रीताई थोरात, बाबासाहेब ओहोळ, शंकरराव खेमनर, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी, लक्ष्मणराव कुटे, रामहरी कातोरे, व्हा. चेअरमन राजेंद्र चकोर, संचालक आर. बी राहणे, विलासराव वर्पे, भास्करराव सिनारे, संतोष मांडेकर, विलास कवडे ,बबनराव कुऱ्हाडे, बादशहा वाळुंज ,संजय पोकळे, विक्रम थोरात, विष्णू ढोले, तुकाराम दातीर ,रवींद्र रोहम, सौ प्रतिभाताई जोंधळे ,सौ मंदाताई नवले ,भारत मुंगसे, डॉ. प्रमोद पावसे ,कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी, गणपतराव शिंदे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी आमदार थोरात म्हणाले, दूध व्यवसाय हा अत्यंत कष्टाचा आणि अडचणीचा असूनही तालुक्यातून दररोज सात लाख लिटर दूध उत्पादन होत असल्याने दुधाचा तालुका म्हणून आपली ओळख निर्माण झाली आहे. राजहंस दूध संघाने गुणवत्ता व चांगल्या कारभारातून राज्य पातळीवर मोठा लौकिक निर्माण केला आहे. हा सहकारी संघ सर्वांना जपायचा आहे. सहकारी संघांमुळेच खाजगी संघांवर नियंत्रण असते. खाजगीवाले नफा कमवण्यासाठी काम करतात .50 पैसे भाव वाढीव मिळाला म्हणून काही लोक खाजगींना दूध देतात. आणि पुन्हा त्यांनी भाव कमी केला की सहकाराकडे येतात. हे अत्यंत चुकीचे आहे.दुधाला भाववाढ मिळावी म्हणून आपण विधानसभेत भांडलो म्हणून पाच रुपये अनुदान मिळाले.


तर रणजीतसिंह देशमुख म्हणाले की, राजहंस दूध संघाने या वर्षात 538 कोटींची उलाढाल केली असून 408 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खिशामध्ये दिले. आहे .मुरघास योजनेने तालुक्यात मोठी क्रांती केली असून दहा मेडिकल मधून स्वस्त दरामध्ये उत्पादकांना औषधे पुरवले जात आहेत. राज्यांमध्ये प्रथमच गाईंची आरटीपीसीआर टेस्ट केली जात असून यामुळे गाईंना आलेल्या तापाचे तातडीने निदान होते. त्यातून औषध उपचाराचा खर्च कमी होतो. अमृतवाहिनी बँक व स्टेट बँकेच्या सहकार्याने पंधराशे शेतकऱ्यांना दूध उत्पादन वाढीसाठी 20 कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिली असून 15000 शेतकऱ्यांना विमा योजने सह विविध योजनांसाठी स्मार्ट कार्ड दिले असल्याचे ते म्हणाले.

यावेळी डॉ जयश्रीताई थोरात यांनी इंदिरा महोत्सव अंतर्गत महिला उद्योजकता विकास योजनेबाबत बाबत माहिती दिली.
या कार्यक्रमाचे स्वागत व्हा. चेअरमन राजेंद्र चकोर यांनी केले नोटीसचे वाचन कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी यांनी केले तर विलास कवडे यांनी आभार मानले. यावेळी तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी दूध उत्पादक शेतकरी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

काँग्रेसची राष्ट्रीय कमिटी ही सर्वोच्च असून 1948 मध्ये अच्युतराव पटवर्धन यांची निवड झाली होती. त्यानंतर आपली निवड झाली आहे .पक्षावर निष्ठा, विचारांशी बांधिलकी ,तत्त्वनिष्ठ हे आपण कायम जपले. कधीही सत्तेसाठी उड्या मारल्या नाही. सीडब्ल्यूसी वर निवड होणे हा एक इतिहास असून संगमनेर तालुक्यासाठी गौरवास्पदबाब असून हा संगमनेर तालुक्याचा सन्मान असल्याचेही आमदार थोरात यांनी म्हटले

मिशन 50 लिटर
तालुक्यात 50 लिटर दूध देणाऱ्या गाई निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे .यासाठी 25 डॉक्टरांचे पथक 1250 गाईंचा गट करून त्यांची आरोग्य तपासणी ,निर्जंतुकीकरण, रक्त तपासणी यांसह गायभरणीसाठी विदेश सॉर्टेड सिमेंट वापरून 50 लिटर दूध उत्पादित करणारी गाय निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. याचबरोबर संगमनेर तालुका दूध संघात सौर ऊर्जा युनिट बसवले जाणार असून तालुक्यातील गाव पातळीवर संस्थांवर सुद्धा सौर ऊर्जा युनिट बसवले जाणार आहे. शासनाचे पाच रुपये अनुदान हे सर्व शेतकऱ्यांना वाटप केले असल्याचीही ते म्हणाले.

