राहुरी । झुंझार न्यूज
राहुरी तालुक्यातील कणगर येथे आगामी गुरुवारी, १४ मे २०२६ रोजी एका ऐतिहासिक आणि भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार डॉ. रामदास आठवले आणि नवनिर्वाचित आमदार अक्षयकर्डिले यांचा भव्य नागरी सत्कार तसेच डॉ.बाबासाहेबआंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडणार आहे.

या सोहळ्यासाठी राज्याच्या राजकारणातील अनेक दिग्गज नेते एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी मंत्री प्राजक्ता तनपुरे, माजी मंत्री अविनाश महातेकर, ज्येष्ठ नेते काकासाहेब खंबाळकर आणि जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव यांच्यासह राज्यस्तरीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
हा भव्यदिव्य सोहळा गुरुवार, दि. १४ मे २०२६ रोजी सायंकाळी ठीक ७ वाजता कणगर येथे आयोजित करण्यात आला आहे. नवनिर्वाचित आमदार अक्षय कर्डिले यांनी आमदारकीची निवडणूक जिंकल्यानंतर प्रथमच या भागात इतका मोठा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण नामदार डॉ. रामदास आठवले यांच्या हस्ते होणार असल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

या ऐतिहासिक सोहळ्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) आणि महायुतीचे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रिपाईचे राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे आणि अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी केले आहे.

कार्यक्रमाच्या नियोजनासाठी कणगर परिसरातील ग्रामस्थ आणि रिपाईचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले असून, जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात या सोहळ्याची मोठी चर्चा रंगली आहे.



