गौतम बुद्धांनी मानवाच्या मनातील अहंकार नष्ट करून समाजात समता निर्माण करण्याचे महान कार्य केले. प्रज्ञा, शील आणि करुणा या विचारसरणीचा आधार घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अहोरात्र कष्ट उपसले. स्वतःच्या जिवाची पर्वा न करता त्यांनी देशाला संविधान दिले. जर बाबासाहेब नसते, तर आज आपले अस्तित्व नसते. त्यांचा हा त्याग पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहील, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले.
राहुरी तालुक्यातील कणगर येथे गुरुवार, १४ मे २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा आणि जिल्हा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने ना. रामदास आठवले यांचा भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. या ऐतिहासिक सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी बोलताना ना. आठवले पुढे म्हणाले की, “बाबासाहेबांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष हा केवळ फोटो काढण्यासाठी मर्यादित राहू नये. पक्षाची व्याप्ती वाढवून सर्व समाजातील लोकांना सोबत घेणे काळाची गरज आहे. रिपाईची गावशाखा ही केवळ एका समाजापुरती मर्यादित न ठेवता ती सर्वसमावेशक बनवा.”
युवकांनी छोट्या-मोठ्या नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा देशसेवेचे ध्येय ठेवावे. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या ‘महार बटालियन’मध्ये आणि भारतीय सैन्यात सामील होऊन आपली व देशाची प्रगती साधावी, असा मोलाचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
विरोधकांकडून संविधान बदलले जाणार असल्याच्या वावड्या उठवल्या जात आहेत, असा टोला लगावत आठवले म्हणाले की, “बाबासाहेबांनी दिलेले संविधान कधीच बदलू शकत नाही. या देशात अनेक धर्माचे लोक राहतात, त्यात हिंदू धर्म मोठा असला तरी संविधानाने सर्वांना समान न्याय दिला आहे. बौद्ध तत्वज्ञान हे विज्ञानावर आधारित असून त्यात अंधश्रद्धेला जागा नाही.”
आपल्या खास शैलीत फटकेबाजी करताना ना. आठवले म्हणाले, “अनेकांना वाटत होते की यावेळी आठवलेंचा पत्ता कट होईल, मात्र मी म्हणालो- ‘चल हट’! कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माझे संबंध अत्यंत दृढ आहेत. सत्ता असो वा नसो, मी नेहमी जनतेमध्ये राहणारा माणूस आहे.”
या सोहळ्याचे औचित्य साधून ज्येष्ठ नेते अशोकराव गायकवाड, भाऊसाहेब पगारे, राजन ब्राम्हणे, संदीप वाघमारे, विशाल सुरडकर यांच्यासह विविध पक्षांतील अनेक कार्यकर्त्यांनी ना. रामदास आठवले यांच्या उपस्थितीत रिपब्लिकन पक्षात (रिपाई) जाहीर प्रवेश केला.
या सोहळ्यासाठी रिपाई महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सौ. सीमाताई आठवले, ज्येष्ठ नेते काकासाहेब खंबाळकर, जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव, राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे , जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, सचिन मोहिते , भिमा बागुल , सुनिल साळवे , सुभाष त्रिभुवन , आशिष शेळके , योगेश मुन्तोंडे , कैलास कासार , बाळासाहेब कदम , नानासाहेब कदम , विलास साळवे , यांच्यासह अनेक राज्यस्तरीय पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी केले.
या सोहळ्यानिमित्त संपूर्ण कणगर गाव ‘भीममय’ झाले होते. ग्रामस्थांनी ना. आठवले आणि इतर मान्यवरांचे अत्यंत उत्साहात आणि जंगी स्वागत केले. यावेळी सौ. सीमाताई आठवले, विजयराव वाकचौरे, अशोक गायकवाड, श्रीकांत भालेराव, पोपट दिवे यांचीही भाषणे झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत सर्वच पक्षांत आदराची भावना असून, विनाकारण वाद टाळून समाजहित जोपासावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.