कोपरगाव । झुंजार न्यूज

राज्यात असंख्य भक्तांचे शक्तिस्थान असलेल्या तालुक्यातील उक्कडगाव येथील श्री रेणुका माता मंदिर ट्रस्ट जीर्णोद्धारा साठी खिर्डीगणेश येथील पवन भाऊसाहेब रोहम याने आजी बिजलाबाई कारभारी रोहम यांच्या स्मरणार्थ कळसाच्या कामासाठी तीन लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांची आर्थिक मदत केली आहे.
         
खिर्डी गणेश येथील पवन भाऊसाहेब रोहम या विद्यार्थ्याने संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रिक डिप्लोमा चे शिक्षण पूर्ण करत आपल्या यशाच्या जोरावर जर्मनी देशात म्युनिक शहरात बीएमडब्ल्यूची कंपनी असलेल्या आर्क इंजिनिअरिंग कंपनीत पॉवर इलेक्ट्रॉनिक्स डेव्हलपर्स या पदावर नोकरी मिळवली. त्याला वार्षिक ५७ लाख रुपयांचे पॅकेज मिळाले, गेल्या चार वर्षापासून ते जर्मनीत आहेत. मध्यंतरी कोरोना आपत्तीमुळे त्यांना भारतात येता आले नाही, ते आता सध्या भारतात आले असुन, त्यांनी त्यांच्या आजीच्या स्मरणार्थ कुलदेवी असलेल्या उक्कडगावच्या रेणुका देवी मातेच्या चरणी आपले पहिले वेतन दान म्हणून दिले आहे. 
             
याप्रसंगी वडील भाऊसाहेब कारभारी रोहम, आई मंजुषा, बोकटे येथील चुलते जनार्दन कारभारी रोहम व कुटुंबीय उपस्थित होते. उक्कडगाव रेणुका माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अशोक शिंदे, उपाध्यक्ष निवृत्ती शिंदे, विश्वस्त बाबासाहेब शिंदे लुखाजी शिंदे, सोपान शिंदे, बाळासाहेब शिंदे, नंदू शिंदे यांनी रोहम कुटुंबीयांचा मंदिर प्रशासनाच्या वतीने शाल, श्रीफळ, देवीची प्रतिमा देऊन सत्कार केला. नंदू शिंदे व गुना मामा कराळे यांनी आभार मानले. या मंदिर जीर्णोद्धार कामासाठी संभाजीनगरचे भाविक आहेर यांच्याकडून झुंबर, तर दिनेश यादव (नाशिक) ६ लाख रुपयांचे मार्बल सिंहासन, हरुण मिस्तरी यांच्या देखरेखी खाली मंदिर जीर्णोद्धाराचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे नंदू शिंदे म्हणाले.
            
    
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मध्ये अभियांत्रिकी, तांत्रिक, व्यवस्थापकीय, आदी उत्तम, उच्च प्रतीचे शिक्षण दिले जाते, त्याच्या जोरावर आपल्याला जर्मनी येथे नोकरी मिळाल्याचे पवन रोहम म्हणाले. सध्या त्रंबकेश्वर मंदिराच्या धर्तीवर उक्कडगाव रेणुका माता मंदिर जिर्णोद्धाराचे काम अंतिम टप्प्यात आहे, यासाठी भारतभरासह अनेक देवी भक्तांनी यथाशक्ती प्रमाणे मदत केली आहे. सरला बेट येथील ब्रह्मलीन महंत नारायणगिरी महाराज यांनी येथील पशु बळीची प्रथा बंद केली होती. गोदाधामचे प्रमुख महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते (२०१०) १४ वर्षापूर्वी या मंदिर निर्माण कार्याचे भूमिपूजन करण्यात आले होते.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *