चुकीच्या गोष्टींना उत्तर द्यावे लागेल : बाळासाहेब थोरात
काँग्रेसचा विचार हा जनकल्याणाचा शाश्वत विचार
अजय फटांगरे यांचा सत्कार
संगमनेर । झुंजार न्यूज
संतांचा समतेचा विचार हा राज्यघटनेमध्ये आहे. काँग्रेसचा विचार हा शाश्वत विचार असून तरुणांना काँग्रेसमध्ये मोठी संधी आहे. तालुक्यामध्ये काही लोक दांडगाई करू पाहत आहे. अशा लोकांना वेळीच रोखले पाहिजे. हा तालुका सुसंस्कृत विचारांचा आहे. आपली राजकीय सुसंस्कृत परंपरा जपत येणाऱ्या काळात चुकीच्या गोष्टींना उत्तर द्यावेच लागेल असे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना येथे काँग्रेसचे नूतन तालुकाध्यक्ष अजय फटांगरे यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते पांडुरंग पा. घुले, इंद्रजीत भाऊ थोरात, मावळते अध्यक्ष मिलिंद कानवडे, डॉ. जयश्रीताई थोरात, शंकरराव पाटील खेमनर, सुधाकर जोशी, विश्वासराव मुर्तडक, सोमेश्वर दिवटे, सौ अर्चनाताई बालोडे, संपतराव डोंगरे, नवनाथ आरगडे, सुरेश झावरे, सुभाष सांगळे, रावसाहेब दुबे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, संगमनेर तालुक्याला संघर्षाचा इतिहास आहे. अनेक वर्षांच्या कामातून हा तालुका उभा राहिला आहे. सुसंस्कृत राजकीय परंपरा ही आपली ओळख आहे. मात्र सध्या तालुक्यात वातावरण चुकीचे होत आहे. ज्येष्ठ व तरुणांना एकत्र येऊन संघर्ष करावा लागेल. दमदाटी दांडगाईचा बंदोबस्त करावा लागेल. आपण सुसंस्कृत आहोत. पण चुकीचे कोणी वागत असेल तर ते होऊ देणार नाही .यावर कार्यकर्त्यांनी ठाम झाले पाहिजे.

अनेक लोक विष कालवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा चुकीच्या गोष्टींना वेळीच उत्तर द्यावे लागेल. तालुक्याची सुसंस्कृत राजकीय संस्कृती टिकवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती ,नगरपालिका या निवडणुका मोठ्या मताधिक्याने आपल्याला जिंकायचे आहेत. आपसातील मतभेद दूर ठेवून जनकल्याणाचा व संतांचा विचार असलेला काँग्रेसचा शाश्वत विचार घेऊन प्रत्येकाने काम करावे असे आवाहन त्यांनी केले.

तर अजय फटांगरे म्हणाले की, माजी मंत्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली आपण कायम काँग्रेस पक्षाचा विचार खेडोपाडी नेण्यासाठी काम केले आहे. पक्षाने व नेतृत्वाने मोठी संधी आहे. आपली ताकद मोठी असून एकत्रितपणे संघर्षाच्या काळात काम करून पुन्हा काँग्रेसला वैभव प्राप्त करून देऊ यासाठी आपण कटिबद्ध राहू असे ते म्हणाले. तर मिलिंद कानवडे म्हणाले की, काँग्रेस पक्षाला मोठी परंपरा असून आपण अत्यंत प्रामाणिक काम केले यापुढील काळातही माजी मंत्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे निष्ठावंतपणे काम करून असे ते म्हणाले. यावेळी युवक काँग्रेसच्या विविध पदाधिकाऱ्यांनी ही आपले मनोगत व्यक्त केली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नवनाथ आरगडे यांनी केली तर सोमेश्वर दिवटे यांनी आभार मानले यावेळी संगमनेर तालुका काँग्रेसचे पदाधिकारी अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी व युवक काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

युवकांसाठी वारीचा अनुभव संस्मरणीय – डॉ. जयश्रीताई थोरात
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील 500 युवक वारीमध्ये सहभागी झाले. अभंग, फुगड्या ,भजन असा विठ्ठलाचा नामाचा गजर करत या वारीमध्ये सर्वजण स्वतःला विसरून सहभागी झाले होते. जीवनात एकदा तरी वारी करावी असे सांगताना सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रचंड झालेली ट्रॅफिक हटवण्यासाठी संगमनेरच्या युवा वारकऱ्यांनी केलेली मदत कौतुकास्पद ठरली असून वारीचा अनुभव हा सर्वांसाठी जीवनात मोठा अनमोल ठेवा ठरला असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी युवा काँग्रेसच्या वतीने माजी मंत्री बाळासाहेब थोरात व डॉ.जयश्रीताई थोरात यांचा विठ्ठलाची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला
