मराठा लष्करी भूप्रदेश म्हणून मानांकनासाठी पंतप्रधानांनी केलेल्या प्रयत्नांना यश

ऐतिहासिक, अभिमानास्पद, गौरवशाली क्षण : मुख्यमंत्री फडणवीस

प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, सिंधुदुर्ग, लोहगडमा समावेश

मुंबई । झुंजार न्यूज
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पर्शाने पावन झालेल्या दुर्गराज रायगडासह १२ गड-किल्ल्यांचा ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळात समावेश करण्यात आला आहे.
संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना अर्थात ‘युनेस्को’ने रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी आणि जिंजी या १२ किल्ल्यांना जागतिक वारसास्थळाचा दर्जा बहाल केला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या देदीप्यमान इतिहासाला जागतिक पटलावर मानाचे स्थान मिळाले आहे.

विशेष म्हणजे, ‘युनेस्को’कडे पाठपुरावा करण्यासह देश-विदेशातून या प्रस्तावास नामांकन मिळावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांनी गडकोटांचा आधार घेत स्वराज्याची स्थापना केली. सांस्कृतिक वारसा या श्रेणीत मोडणारे, स्वराज्याचे रक्षण करणारे १२ किल्ले जागतिक वारसा नामांकनामध्ये समाविष्ट व्हावेत, यासाठी राज्य सरकारच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये
संचालनालयाने प्रस्ताव तयार केला होता. यामध्ये, महाराष्ट्रातील रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी किल्ला यांचा समावेश करण्यात आला.

दक्षिण दिग्विजय मोहिमेत छत्रपती शिवरायांनी जिंकलेला, तामिळनाडूतील जिंजी हा एक किल्लाही होता. या सर्व १२ किल्ल्यांना ‘युनेस्को’ने जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केले आहे.

वैशिष्ट्यपूर्ण रचना महत्त्वाची
शिवरायांनी स्वराज्यनिर्मितीसाठी व रक्षणासाठी भौगोलिक स्थितीचा सर्वोत्तम उपयोग करून अनेक किल्ल्यांची उभारणी केली. अस्तित्वात असलेल्या अनेक किल्ल्यांची पुनर्बाधणी करून त्यांचा खुबीने वापर केला.

महाराष्ट्रातील किल्ले हे भव्य स्थापत्यकलेसाठी ओळखले जातात. शत्रूच्या नजरेस थेट न पडणाऱ्या दरवाजांची वैशिष्ट्यपूर्ण रचना व किल्ल्यांचे माची स्थापत्य हा मराठा दुर्ग स्थापत्यशास्त्रातील महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे. या किल्ल्यांवर आढळणारे माची स्थापत्य जगभरातील अन्य कोणत्याही किल्ल्यांच्या रचनेमध्ये दिसून येत नाही.

माची रचनेस अनेकवेळा तटबंदी, बुरूज, दरवाजे आणि खंदकांनी सुरक्षित केलेले असते. माची स्थापत्य म्हणजे गडाच्या सुरक्षिततेचा आणि युद्धकौशल्याचा मुत्सद्दी नीतीने रचलेला भाग आहे. या वैशिष्ट्यपूर्ण, अद्वितीय वैश्विक मूल्यांमुळे या किल्ल्यांना ‘जागतिक वारसा’ म्हणून स्वीकारण्यात आले आहे.




