कोपरगांव । झुंजार न्यूज

 

कोपरगाव तालुक्यातील टाकळी ते धारणगाव रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, या रस्त्यावरून प्रवास करणे नागरिकांसाठी एक मोठी समस्या बनली आहे.

 

 

जवळपास ५० ते ६० कुटुंबांची वस्ती असलेल्या या परिसरातील नागरिकांना, शालेय विद्यार्थ्यांना आणि शेतकऱ्यांना या खड्डेमय रस्त्यामुळे रोजच्या जीवनात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, या रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर झाल्याची नोंद असूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

 

 

गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे मोटारसायकल स्वारांना गाडी चालवताना मोठी कसरत करावी लागत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. पावसाळ्यात तर या रस्त्याची परिस्थिती अधिकच बिकट होते, खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने रस्त्याचा अंदाज घेणेही कठीण होते.

 

या रस्त्याच्या दुर्दशेचा सर्वाधिक फटका येथील शेतकरी वर्गाला बसत आहे. शेतीमाल, दूध आणि जनावरांसाठी चारा बाजारात ने-आण करणे अत्यंत जिकिरीचे झाले आहे. वाहने खराब होण्याचे प्रमाण वाढले असून, वेळेवर माल पोहोचवणेही कठीण झाले आहे. तसेच, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे परिसरातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्या-येण्यात मोठा त्रास सहन करावा लागतो. एखादी आपत्कालीन आरोग्यविषयक घटना घडल्यास, खराब रस्त्यांमुळे रुग्णांना वेळेवर आरोग्य सुविधा पुरविण्यास विलंब होत असल्याने नागरिकांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला आहे.

स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आणि पाठपुराव्यानंतर या रस्त्याच्या कामाला प्रशासकीय स्तरावर मंजुरी मिळाल्याचे दिसून येते. ३१ मार्च २०२१ रोजी प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रामीण रस्ते विकास मजबुतीकरणासाठी कोपरगाव तालुक्यातील विविध रस्त्यांना निधी मंजूर करण्यात आला होता. यामध्ये ‘प्रजिमा ५ ते (टाकळी) ते धारणगाव ते प्रजिमा ८ ला मिळणारा रस्ता’ या कामाचा समावेश होता. मात्र, या निधी मंजुरीला आता तीन वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला असला तरी, रस्त्याचे काम प्रत्यक्षात सुरू झालेले नाही. त्यामुळे, हजारो कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर होऊनही या रस्त्याची दुरवस्था का, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत.

 

विविध रस्त्यांच्या कामांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना अनेकदा निवेदने देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे, टाकळी ते धारणगाव रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांना या नरकयातून मुक्त करावे, अशी जोरदार मागणी जोर धरत आहे.

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *