संगमनेर तालुक्यातील मांची गावाचे सुपुत्र आणि सध्या जळगावच्या मुळजी जेठा महाविद्यालयातील भूगोल विभागात कार्यरत असलेले प्रा. सागर भाऊसाहेब डोंगरे यांना ‘ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्था, टाकळीभान’ यांच्यातर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे, प्राचार्य डॉ. कुंडलिक शिंदे, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र फाळके, श्रीरामपूर पंचायत समितीच्या माजी सभापती डॉ. वंदना मुरकुटे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाबूराव उपाध्ये आणि ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अर्जुन राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रा. डोंगरे यांना हा गौरवपूर्ण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रा. सागर डोंगरे हे प्रवरा ग्रामीण शिक्षक संस्थेतील दिवंगत आणि सेवानिवृत्त शिक्षक भाऊसाहेब डोंगरे यांचे सुपुत्र आहेत. त्यांना हा सन्मान मिळाल्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. त्यांच्या या यशाने मांची गावाचा आणि परिसराचा गौरव वाढला आहे.