नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या अमानुष हल्ल्याने संपूर्ण पत्रकार समाजात संताप व्यक्त होत आहे. झी २४ तासचे ब्युरो चीफ योगेश खरे, साम टीव्हीचे ब्युरो चीफ अभिजित सोनवणे व पुढारी न्यूजचे किरण ताजणे या तीन पत्रकारांवर त्र्यंबकेश्वर येथील पार्किंगमध्ये कार्यरत असलेल्या गुंडांनी बेदम मारहाण करून जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात संबंधित पत्रकार गंभीर जखमी झाले असून उपचार सुरू आहेत.
पत्रकारांवर वारंवार होणारे हल्ले ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा असल्याचे मत व्यक्त करत, या घटनेचा आश्वी प्रेस क्लबच्या वतीने जाहीर तीव्र निषेध करण्यात आला आहे. हल्लेखोर गुंडांवर तातडीने कायदेशीर कडक कारवाई करून कठोर शिक्षा द्यावी, ही क्लबची ठाम मागणी आहे.
आश्वी प्रेस क्लबचे अध्यक्ष व जेष्ठ पत्रकार सिताराम चांडे, तसेच पत्रकार योगेश रातडिया, रविंद्र बालोटे, वैभव ताजणे, सुरेश थोरात, अनिल शेळके, राजेश गायकवाड, संजय गायकवाड आदींनी एकत्र येऊन या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला.
पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्वात असूनही त्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे असे प्रकार घडत असल्याची खंत पत्रकारांनी व्यक्त केली. पत्रकारांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलावीत, अन्यथा पत्रकार रस्त्यावर उतरून आंदोलनाचा मार्ग अवलंबतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.