श्रीरामपूर । झुंझार न्यूज

 

 

नगरपरिषद निवडणुकीत माघारीचा अखेरचा दिवस शिंदे गटासाठी अत्यंत धक्कादायक ठरला. प्रभाग १७ मधून अधिकृत उमेदवार प्रमोद कुऱ्हे यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक माघार घेतली, तर प्रभाग ८-अ मध्ये पक्षाला एकही उमेदवार उभा करता आला नाही. या दोन घटनांनी शहरातील निवडणूक-समीकरणे पूर्णतः बदलून गेली आहेत.

प्रचार सुरळीत सुरू असतानाच प्रभाग १७ मधील अचानक घेतलेल्या निर्णयामुळे कार्यकर्ते आणि नेतृत्व दोन्ही गोंधळून गेले. आंतरकलह, दबावाचे राजकारण आणि स्थानिक जातीय–राजकीय गुंतागुंतीमुळे ही माघार घ्यावी लागल्याच्या चर्चा रंगल्या, मात्र पक्षाने अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही.

 

 

 

याहून मोठा धक्का म्हणजे प्रभाग ८-अ मध्ये उमेदवारच न मिळणे. वारंवार चर्चा, तडजोडी आणि बैठका झाल्या तरी कोणताही मजबूत चेहरा पुढे आला नाही. या अपयशामुळे शिंदे गटाची संघटनात्मक ताकद प्रश्नचिन्हात आली आहे. कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढली असून मतदारांत पक्षाच्या कमकुवत नेतृत्वाबद्दल चर्चा सुरू आहे. या घडामोडींमुळे विरोधकांचे पारडे अचानक जड झाले असून, स्वतंत्र उमेदवारांनाही प्रचंड फायदा होण्याची शक्यता वाढली आहे. शहरात नवीन युती, गुप्त पॅनल्स आणि राजकीय हालचालींचा त्सुनामी येण्याचे संकेत मिळत आहेत. प्रभाग १७ मधील माघार आणि प्रभाग ८-अ मधील रिक्तता या दोन्ही घटनांनी शिंदे गटाचे संपूर्ण गणित ढवळून निघाले आहे. आगामी काही दिवसांत श्रीरामपूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *