रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांना त्यांच्या सौभाग्यवती सुशीला त्रिभुवन यांच्या समावेत ‘कर्तव्यदक्ष समाजसेवक’ या पुरस्काराने गौरविण्यात आले.
हा सन्मान मौलाना आझाद कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचे मॅनेजर साहेबराव जाधव यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी माणिक जाधव, सुनील जाधव, अनिल जाधव आणि महेंद्र जाधव उपस्थित होते.
यावेळी बोलताना साहेबराव जाधव यांनी सुभाष त्रिभुवन यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले की, अहिल्यानगर जिल्ह्यात सुभाष त्रिभुवन यांनी सामाजिक क्षेत्रात नेहमीच पुढाकार घेत विविध प्रश्न सोडवण्याचे काम केले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे.
तसेच श्रीरामपूर येथील विस्थापित व्यापाऱ्यांचा प्रश्न असो किंवा श्रीरामपूर जिल्हा करण्यासाठीची आंदोलने असोत, अन्यायाला वाचा फोडण्याचे आंदोलने असो कायम दक्ष राहून अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचे समाजकार्य सुभाष त्रिभुवन यांनी प्रत्येक वेळी पुढे येऊन समाजहिताचे कार्य केले आहे. अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात, असेही जाधव यांनी नमूद केले.
“सुभाष त्रिभुवन हे संभाजीनगरचे जावई असल्याचा आम्हाला अभिमान आहे. त्यांच्या हातून पुढेही असेच सामाजिक कार्य घडत राहो,” अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या. कार्यक्रमास अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.