काँग्रेसमध्ये तरुणांना मोठी संधी
संगमनेरमध्ये संघटन सृजन अभियानांतर्गत पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न
संगमनेर । झुंझार न्यूज
खा. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेमधून देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या भावना समजून घेतल्या. देशात सध्या जातीपातीचे आणि भेदभावाचे राजकारण सुरू आहे. हे देशासाठी धोकादायक असून या विरुद्ध सर्वांना सोबत घेऊन काँग्रेस लढत आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये काँग्रेस आगामी काळात अधिक सक्षम होणार असून काँग्रेस पक्षामध्ये तरुणांना मोठी संधी आहे. पक्षाने सुरू केलेले संघटन सृजन अभियान हे सर्व जाती धर्म , युवक नागरिक महिला या सर्वांना सोबत घेणारे असल्याचे प्रतिपादन झारखंड राज्याचे माजी प्रदेशाध्यक्ष राजेश ठाकूर यांनी केले आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळ येथे तालुका काँग्रेसच्या वतीने आयोजित संघटन सृजन अभियान कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर ओडिसाचे माजी मंत्री सरत राऊत, लातूरचे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव श्रीकृष्ण सांगळे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, सौ दुर्गाताई तांबे, ॲड माधवराव कानवडे, श्रीरामपूरचे नगराध्यक्ष करण ससाने, सौ प्रभावतीताई घोगरे, मधुकरराव नवले ,गिरीजा पिचड, बाबासाहेब दिघे ,शिवाजी नेहे ,उत्तमराव मते, मामा पगारे ,डॉ.हरिओम पवार, शरद नाना थोरात, सचिन चौगुले, हसन भाई पटेल, सुरेश झावरे, सौ पद्मा थोरात, सौ अर्चना बालोडे ,ज्ञानदेव वापारे, लक्ष्मणराव कुटे , पांडुरंग पाटील घुले, सोमेश्वर दिवटे, निखिल पापडेजा, रामहरी कातोरे ,शेखर सोसे, नवनाथ आरगडे, के.के थोरात, सौ प्रमिला अभंग, कर्जतचे तालुकाध्यक्ष किरण पाटील, ॲड पंकज लोंढे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना झारखंडचे माजी प्रदेशाध्यक्ष राजेश ठाकूर म्हणाले की महाराष्ट्र आणि अहिल्यानगर जिल्हा हा काँग्रेसच्या विचारांचा बालेकिल्ला राहिला आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्यांचा शाश्वत विचार असलेली काँग्रेसची विचारधारा प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी युवकांनी अधिक सक्रिय झाले पाहिजे. काँग्रेस मधील कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून देशांमध्ये सुरू असलेल्या एकाधिकारशाहीला रोखण्यासाठी अधिक सक्रियतेने काम करावे. देशामध्ये सध्या जातीचे आणि भेदभावाचे राजकारण सुरू आहे. खा.राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे संघटन सृजन अभियान हे एकीची भावना निर्माण करणारे आहे. सर्व कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखात सहभागी होण्याबरोबर जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरले पाहिजे. या पक्षामध्ये तरुणांना अधिक संधी असून आगामी काळ हा काँग्रेसचा असेल असा विश्वास त्यांनी जनतेला दिला.
तर ओडिसाचे माजी मंत्री सरत राऊत म्हणाले की, उत्तर आणि दक्षिणेचा संगम हा संगमनेर मध्ये झाला आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यातील सहकार शिक्षण आणि ग्रामीण विकास हा देशाला दिशादर्शक ठरणारा आहे. हा तालुका काँग्रेसच्या विचारांचा बालेकिल्ला असून आपल्याला पुन्हा काँग्रेसचा विचार प्रत्येक माणसापर्यंत पोहोचून संगमनेर ची ताकद राज्याला दाखवून द्यायचे असल्याचे ते म्हणाले
तर खासदार शिवाजीराव काळगे म्हणाले की, लातूर आणि संगमनेरचे प्रेम महाराष्ट्राने पाहिले आहे लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी पालकमंत्री म्हणून लातूरमध्ये केलेले काम लातूरकर कधीही विसरणार नाही. राहुल गांधी यांनी केलेल्या पद यात्रेतून सामान्य कार्यकर्त्याच्या भावना त्यांनी समजावून घेतल्या असून सर्वांना सामावून घेण्यासाठी हे अभियान असल्याचे ते म्हणाले.
तर जिल्हाध्यक्ष सचिन गुजर म्हणाले की अहिल्यानगर जिल्हा हा काँग्रेसच्या विचारांचा राहिला आहे. येथील अनेक नेत्यांनी सहकार शिक्षण संस्थांमधून नेतृत्व केले अनेक लोक मोठे झाले. मात्र काँग्रेस पक्ष अडचणीत आल्यावर हे लोक काँग्रेसला सोडून गेले. अशा अडचणीच्या काळातही लोकनेते बाळासाहेब थोरात हे कायम काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिली आहे. हा आदर्श नवीन पिढी पुढे असल्याचे ते म्हणाले
तर डॉ जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, काँग्रेसचा विचार हा शाश्वत विचार असून देश उभा करण्यामध्ये काँग्रेसचे मोठे योगदान आहे .छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा या मातीला असून येथे जातीपातीचे राजकारण कुणालाही मान्य नाही. महाराजांचे मावळे हे कुण्या एका जातीचे नव्हते. हे सर्व धर्माचे होते. शेतकरी ,रयतेसाठी आणि मानवता धर्मासाठी हा महाराष्ट्र कायम पुढे राहिला असून सर्वांनी काँग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सौ दुर्गाताई तांबे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी संपतराव डोंगरे, लताताई डांगे,राजू पठाण, विजय जाधव, सोन्याबापु वाकचौरे, कल्याण पिसाळ, शब्बीर भाई, अभिजीत लुनिया, राजेंद्र निर्मळ, ज्ञानेश्वर झडे, सचिन कोते, यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी संगमनेर शहर व तालुका व लगतच्या तालुक्यांमधील काँग्रेस पक्षाच्या विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
