संगमनेर । झुंझार न्यूज

समाजातील उपेक्षित, वंचित व गोरगरिबांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन सौ.रेश्मा ढेरंगे यांना ‘समाज भूषण’ या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
श्रीरामपूर येथील आगाशे सभागृहात लोककलावंत साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य व लक्ष्मी माता मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुरस्कार वितरण व कवी संमेलन सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमास व्यासपीठावर प्रा.डॉ.बाबुराव उपाध्ये, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अरुण पाटील नाईक, राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रकाश कुलथे,मा.प्राचार्य टी.ई.शेळके, ज्येष्ठ साहित्यिक सायमन भारस्कर, निवृत्त पोलीस अधिकारी संजय भोंडवे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना सौ.ढेरंगे म्हणाल्या कि, या सन्मानामुळे मला समाजकार्य करण्यासाठी अधिक प्रेरणा व ऊर्जा मिळाली आहे. पुढील काळातही मी समाजासाठी अधिक जोमाने कार्य करत राहीन. आजच्या युगात प्रत्येक स्त्री सक्षम आहे. मात्र स्त्रियांनी आत्मविश्वास वाढवून आत्मपरीक्षण करत समाजकार्य केले पाहिजे. चांगल्या कामाची दखल समाज आपोआप घेतो.
आज या ठिकाणी अनेक ज्येष्ठ साहित्यिक पत्रकार उपस्थित आहेत यांच्या हस्ते माझा गौरव होणं ही खूप माझ्यासाठी प्रेरणा देणारी घटना आहे. मी केलेले काम हे सर्वसामान्य व संघर्षातून उभे राहिलेले आहे. त्यामुळे त्याला टिकाऊपणा आहे. पुढील काळातही स्त्रियांच्या प्रश्नांसाठी शासन दरबारी खंबीरपणे प्रयत्न करत राहीन. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवी बाबासाहेब पवार यांनी केले.
पुरस्कार मिळाल्याबद्दल राज्याचे माजीमंत्री बाळासाहेब थोरात,मा.आ.डॉक्टर सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे,डॉ.जयश्रीताई थोरात यांनी अभिनंदन केले आहे.
