हर्षा ठाकूर; हिवरगाव पावसा येथे हिंदू महासंमेलन

 

 

 

संगमनेर । झुंझार न्यूज

 

 

लव्ह जिहाद, लँड जिहाद पाठोपाठ आता ‘कॉर्पोरेट जिहाद’सारखा प्रकार नुकताच नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. लव्ह जिहादच्या नावाखाली तुमच्याच आया-बहिणींना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसविण्याचे प्रकार सुरू आहेत. ते हाणून पाडण्यासाठी सर्व हिंदू धर्मीय समाजबांधवांनी एकत्र येणे काळाची गरज आहे, असे आवाहन नांदेडच्या प्रखर हिंदुत्ववादी वक्त्या हर्षा ठाकूर यांनी केले.

 

संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे आयोजित करण्यात आलेल्या हिंदू महासंमेलनामध्ये मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ, जुन्नर येथील हिंदुत्ववादी वक्ते सुनील काळे, अयोध्या येथील राजश्री महंत एकनाथ महाराज, देविका जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी हिंदू महासंमेलनानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

 

ठाकूर म्हणाल्या की, हे जिहादी लोक वेगवेगळ्या व्यवसायांच्या माध्यमातून हिंदू मुलींना आपल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसवत आहेत. त्यांच्यापासून सावध राहणे गरजेचे आहे. आत्तापर्यंत या जिहादींनी मोठ्याप्रमाणात हिंदू मुलींना लव्ह जिहादच्या माध्यमातून फसविले आहे. लव्ह जिहाद हा हिंदू धर्माला लागलेली फार मोठी कीड आहे. त्याचा बिमोड करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. पहलगामसारख्या ठिकाणी धर्म विचारून मारले गेले, ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे.

 

काळे म्हणाले की, भारत माता आणि हिंदू धर्माच्या नावाखाली समाजात जातीजातींमध्ये भांडणे लावून मतभेद निर्माण करण्याचे काम जाणीवपूर्वक काही शक्ती करत आहेत. हिंदू धर्मात मूळतः कधीच जातीय तेढ नव्हती, परंतु काहींनी जातीय तेढ निर्माण करण्याचे काम केले. देशाचे विभाजन करण्यासाठी हे मोठे षड्यंत्र रचले गेले आहे. हे षड्यंत्र मोडून काढण्यासाठी सर्व हिंदूंनी एकत्र येणे गरजेचे आहे. आपल्यातील काही गुणदोषांमुळेच आपण हजारो वर्षे गुलामगिरीत राहिलो. त्यामुळे आता दोषमुक्त हिंदू समाज निर्माण करणे ही काळाची गरज आहे. यासाठी आपणा सर्वांना पूर्वजांचा इतिहास जाणून घेणे आवश्यक आहे. इतिहासाचा अभ्यास केला नाही तर भविष्य आणि वर्तमान डळमळीत होऊ शकते. त्यासाठी इतिहासाचे पुनर्लेखन, समाजातील जागरूकता व स्वाभिमान जागविण्यावर भर देणे गरजेचे आहे.

 

हिंदू संमेलन घेण्यामागील भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघटक अक्षय थोरात यांनी स्पष्ट केली, तर आभार भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे यांनी मानले. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शुभम उपाध्याय यांच्या ‘वंदे मातरम’ने संमेलनाची सांगता झाली.

या हिंदू संमेलनास हिवरगाव पावसा, चंदनापुरी, आनंदवाडी, झोळे, गणेशवाडी, रायतेवाडी, खांडगाव, सावरगाव तळ, शिरापूर, निमगाव टेंभी, देवगाव, जाखुंरी, संगमनेर खुर्द या गावांतील हिंदू समाजबंधू व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed