मुंबई । झुंझार न्यूज


अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीटंचाई आणि ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत रखडलेल्या योजनांच्या प्रश्नावर आज राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार सत्यजीत तांबे यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांच्या अंमलबजावणीत येणारे अडथळे दूर करून कामांना तात्काळ गती देण्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले आहे.
अहिल्यानगर जिल्हा आणि विशेषतः संगमनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांना मंजुरी मिळूनही प्रत्यक्षात कामे सुरू झालेली नाहीत, ही वस्तुस्थिती आमदार सत्यजीत तांबे यांनी बैठकीत मांडली. अनेक ठिकाणी वर्क ऑर्डर (कार्यारंभ आदेश) देऊनही कंत्राटदारांकडून कामात टाळाटाळ केली जात आहे, तर काही ठिकाणी तांत्रिक अडचणी आणि प्रशासकीय समन्वयाचा अभाव यामुळे नागरिक शुद्ध पाण्यापासून वंचित असल्याचे तांबे यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

यावेळी बोलताना आमदार तांबे म्हणाले की, “पाणी हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे. ९ जुलै २०२५ रोजी पावसाळी अधिवेशनातही मी या प्रश्नावर आवाज उठवला होता. अनेक गावांत पाईपलाईनचे काम अर्धवट आहे. नागरिकांना वेळेत पाणी मिळण्यासाठी आता विलंब करून चालणार नाही. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.”

आमदार सत्यजीत तांबे यांनी मांडलेली गांभीर्यपूर्वक परिस्थिती लक्षात घेता, मंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना कडक शब्दांत सूचना दिल्या. “योजनांच्या अंमलबजावणीत कोणतीही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. ज्या ठिकाणी तांत्रिक अडचणी आहेत, त्या तात्काळ निकाली काढा आणि रखडलेल्या कामांना तातडीने गती द्या,” असे निर्देश मंत्र्यांनी दिले. तसेच, प्रत्येक योजनेच्या प्रगतीचा अहवाल नियमितपणे तपासला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या महत्त्वपूर्ण बैठकीस अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आनंद भंडारी यांच्यासह पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत जिल्ह्यातील प्रत्येक योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

आमदार सत्यजीत तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील पाणीप्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मंत्र्यांच्या सकारात्मक निर्णयामुळे आगामी काळात जलजीवन मिशनच्या कामांना वेग मिळून अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेला दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



