कोपरगाव | झुंजार न्यूज
ग्रंथ हे आपले गुरु आहेत, संत समाज तर ग्रंथ जीवनाचे मार्गदर्शक असल्याचे प्रतिपादन शिक्षण क्षेत्रातील विचारवंत वसंतराव खैरनार यांनी केले.

तालुक्यातील संवत्सर येथील अभियंते राजेश यशवंतराव कुलकर्णी यांचे सासरे नारायण कुलकर्णी यांनी स्वामी समर्थ सुश्लोक सहस्रनाम ग्रंथ लिहिला असून त्याचे प्रकाशन नुकतेच झाले त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी स्थापत्य अभियंता रवींद्र रोजेकर होते.

प्रारंभी वरद प्रकाशन संस्थेच्या अध्यक्षा सौ. नूतन राजेश कुलकर्णी यांनी पुस्तकाविषयी माहिती देऊन उपस्थितांचे स्वागतासह पाहुण्यांचा परिचय करून दिला.
प्रस्तुत ग्रंथाचे लेखक, संत साहित्याचे अभ्यासक नारायण कुलकर्णी हे भाषांतर प्रमुख म्हणून ३४ वर्षाच्या भारतीय रेल्वे सेवेतुन निवृत्त होऊन त्यांनी आजवर ऐका काव्यसंग्रहासह नऊ पुस्तकांचे लेखन केले आहे.
अध्यक्ष पदावरून बोलताना रविंद्र रोजेकर म्हणाले की, ग्रंथ लिहून ते समाजापुढे मांडणं हे कठीण काम आहे, मात्र लेखक नारायण काका कुलकर्णी यांनी हे काम अगदी सहजपणे पेलून पूर्णत्वास आणले आहे.

श्री. वसंत खैरनार पुढे म्हणाले की, जीवनात अनेक समस्या प्रत्येकाला भेडसावत असतात वर्तमानस्थितीत संत आणि संतसाहित्य हे त्यावर जगण्याचे बळ तर देतातच पण ते सर्व भक्तांना सकारात्मक जीवन जगण्याची प्रेरणा देखील देतात. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ह्या स्वामींच्या एका वाक्यातच जगातील समस्यांचे निराकरण सामावलेले आहे. अक्कलकोट स्वामी समर्थ देवस्थानच्यावतीनेही प्रस्तुत ग्रंथाचे स्वागत करण्यात आले आहे.

निरामय ज्येष्ठ नागरिक संघाच्या (नाशिक) अध्यक्ष सौ. वैशाली पिंगळे, सचिव बापूसाहेब कुलकर्णी यांनीही सदर ग्रंथाविषयी मार्गदर्शन केले, दत्तरत्न गोविंद नरहर कुलकर्णी व स्थापत्य अभियंता रवींद्र रोजेकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विनिता पिंगळे, अतुल जोशी, सौ नीलू जोशी, डॉ. वरद कुलकर्णी, आशिष जोशी, तरंग चिटणीस, निशांत कुलकर्णी, नारायण घोळे, श्रीमती मंगला फौजदार, जयंत लांडगे आदी उपस्थित होते, शेवटी राजेश कुलकर्णी यांनी आभार मानले.
