अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज

संगमनेर प्रतिनिधी 

 एका बाजूला राज्यात पाऊस नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.  तर दुसऱ्या बाजूला राज्य सरकारला मात्र मंत्रिमंडळ विस्तार,खातेवाटप आणि दिल्लीला जायचे, यायचे पडले आहे. त्यामुळे राज्य सरकारचे शेतकऱ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असल्याची टीका मा. कृषीमंत्री व काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सरकारवर केली आहे.

     विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू झाले आहे .या पावसाळी अधिवेशनात  बोलताना काँग्रेस नेते आ. थोरात म्हणाले की, राज्यात मान्सून उशिराने सुरू झाला आहे .मात्र तोही म्हणावा असा पडत नाही. त्यामुळे काही ठिकाणी अवघ्या २० टक्केच खरिपाच्या पेरण्या झालेल्या आहेत. तर काही ठिकाणी तर पेरण्याच झालेल्या नाही. असे चित्र संपूर्ण राज्यात पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यायला हवा .

 संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागील काही महिन्यात अतिवृष्टी, गारपिट यामुळे खूप शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत, कांद्याच्या बाबतही तीच परिस्थिती निर्माण झाली होती. कांदा उत्पादकांना सरकारने अनुदान देण्याचे जाहीर केले होते परंतु अद्याप त्यांच्यापर्यंत अनुदान पोहोचलेले नाही.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते, त्यावेळेस आठ दिवसात मदत पाठवतो असा शब्द त्यांनी शेतकऱ्यांना दिला होता,परंतु तो अद्यापही सरकारने  पूर्ण केला नाही.

    संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे व खते बाजारामध्ये विक्रीसाठी आले आहेत. तर काही जणांनी सरकारी टोळ्या दाखवून त्यांच्याकडून हप्ते वसूल करण्याचाही कार्यक्रम  राज्यात सुरू केला आहे. या गंभीर प्रकाराकडे राज्य सरकारचे दुर्दैवाने दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ.बाळासाहेब थोरात यांनी केला

चौकट

विरोधी पक्षनेता काँग्रेसचा

विधानसभेमध्ये सर्वाधिक आमदारांची संख्याही काँग्रेस पक्षाची असून विरोधी पक्ष नेतेपद हे काँग्रेसलाच मिळणार आहे. याबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून लवकर निर्णय होईल असेही आमदार थोरात यांनी सांगितले आहे

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed