संगमनेर । झुंजार न्यूज
स्वातंत्र्य व स्वराज्याची चळवळ ज्वलंतपणे सामान्य जनतेपर्यंत पोहचविणारे थोर राष्ट्रपुरुष लोकमान्य टिळक व पोवाडे, लोकगिते यांच्यामधून पिडीत व अन्यायग्रस्तांच्या समस्यांना न्याय देत संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी महत्वाची भूमिका निभविणारे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे देशाच्या इतिहासात मोठे स्थान असल्याचे गौरवोद्गार मा.आ,डॉ, सुधीर तांबे यांनी काढले आहे.
यशोधन संपर्क कार्यालयात लोकमान्य टिळक यांची १०३ वा स्मृतीदिन व अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त संगमनेर मातंग एकता आंदोलन या राज्यव्यापी सामाजिक संघटनेच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ.जयश्रीताई थोरात,ज्ञानेश्वर राक्षे,के.के.थोरात,राजाभाऊ आव्हाड,संतोष गायकवाड,मंजाबापू साळवे,आनंद वर्पे,रमेश गफले,सुरेश झावरे,जावेद शेख,प्रा.बाबा खरात,शिवाजी कांबळे,शिवाजी गोसावी,शिवराम बिडवे,सत्यानंद कसाब,,जगन्नाथ बर्डे,सुमित मतकर,यशोधन कार्यलयाचे कार्यकारी अधिकारी श्रीराम कुऱ्हे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मा.आ,डॉ,तांबे म्हणाले कि, भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील महानायक लोकमान्य टिळक यांनी ब्रिटीशांविरोधात जनमाणसांमध्ये असंतोषाची भावना पेटविली. स्वदेशी,परदेशी मालावर बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण व स्वराज्य ही चतुःसूत्री देशाला दिली. स्वातंत्र्य क्रांतीच्या पायाभरणीत मोठे योगदान त्यांचे राहिले आहे. तसेच साहित्यरत्न लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मोलाचे योगदान दिले. अण्णाभाऊ साठेंनी ३५ कादंबऱ्या तसेच जवळ जवळ अडीचशे ते तीनशे कथा लिहिल्या. सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथून पायी प्रवास केलेल्या अण्णाभाऊंनी पुढे आपल्या प्रतिभेतून जनमाणसांच्या मनावर राज्य केले. त्यांच्या फकिरा कादंबरीला राज्य शासनाचा पुरस्कार ही मिळाला आहे. साहित्य केवळ मराठी भाषेपुरतेच मर्यादित न राहता चौदा भारतीय भाषात तसेच जर्मन, इंग्रजी, झेक, पोलीश, रशियन इत्यादी परकीय भाषात भाषांतरीत झाले आहे. त्यांचे साहित्य जात, धर्म, देश, भाषा इ. बंधनांच्या पलीकडे पोहोचले आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. समाजातील दलित शोषित जनतेने जात – पात, धर्म, मान-पान यांचा त्याग करावा व एक समतेवर आधारीत समाज निर्माण करण्यात हे अण्णाभाऊंचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे असे ही ते म्हणाले.
डॉ.जयाताई थोरात म्हणाल्या कि, लोकमान्य टिळक यांचा १०३ वा स्मृतीदिन व अण्णाभाऊ साठे यांचा जन्मशताब्दी हा योगायोग आहे. या राष्ट्रपुरुषांचे विचार देशाच्या प्रगतीसाठी आमलात आणणे अत्यंत गरजेचे आहे. लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा हे वृत्तपत्र सुरु करुन जनजागृती केली. तर अण्णाभाऊंनी विविध साहित्य प्रकार हाताळले. कथा, कादंबऱ्या, पोवाडे, लावण्या, लोकनाट्य,पदे,गीते अशी विविध क्षेत्रे त्यांनी सहजगत्या पादाक्रांत केली. आपल्या साहित्यातून शोषण, अन्याय, अत्याचाराला विरोध करणे हेच त्यांनी ध्येय मानले व मानवी वृत्ती, प्रवृत्तीचे वास्तव दर्शन वाचकांना घडविले. असे ही त्या म्हणाल्या.
यावेळी ज्ञानेश्वर राक्षे म्हणाले कि, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे दलित,शोषित,पिडीत यांच्यासाठी मोठे काम आहे.
यावेळी शिवाजी आव्हाड,दिपक कांबळे,विकास खरात,संतोष आव्हाड,सचिन शेलार,अमोल पवार, विकास कांबळे,संदिप शेलार,संजय कांबळे,कुंदन खरात,अक्षय वाकचौरे,कृष्णा आप्टेकर यांसह विविध कार्यकर्ते उपस्थित होते.
चौकट
जयहिंद लोकजागरचे गीत गायनातून लोकजागर
आमदार बाळासाहेब थोरात व मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनखाली जयहिंद लोकचळवळीच्या गीत गायन समूहाने जग बदल घालूनी घाव, गेले सांगून मला भीमराव ,वंदन माणसाला अशी प्रबोधनपर गीते गावून अभिवादन केले. यामध्ये डॉ.सुधीर तांबे व डॉ.जयाताई थोरात यांनी ही सहभाग घेतला.
