संगमनेर । झुंजार न्यूज
यंदाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आमदार सत्यजित तांबे यांना पहिल्यांदा जनतेचे प्रश्न मांडण्याची संधी मिळाली. हिवाळी अधिवेशनात आमदार तांबे यांनी अधिवेशनात १०० टक्के हजेरी लावत जनतेचे विविध प्रश्न मांडले. यात तारांकीत प्रश्न, लक्ष्यवेधी सूचना, औचित्याचे मुद्दे, विशेष उल्लेख इत्यादी प्रश्न सभागृहात उपस्थित केले. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, कंत्राटी कामगार, पत्रकार, रोजगार व उद्योगधंदे आदी प्रश्न उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले.
बऱ्याच प्रश्नांना मंत्र्यांकडून सकारात्मक उत्तर मिळाली आणि काही मागण्या व प्रश्न मार्गी लावण्यात यश आले. वडिलांचा समृद्ध वारसा असाच पुढे नेण्याचा प्रयत्न करेन, असेही आ. तांबे यांनी स्पष्ट केले. हिवाळी अधिवेशन काळातील कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्यासाठी सोशल मीडियाच्या व्यासपीठावरून इत्थंभूत माहिती दिली. आमदार तांबे म्हणाले की, देशात व राज्यात बेरोजगारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. सिन्नर येथील इंडिया बुल्सची जमीन सरकारने ताब्यात घ्यावी. तिथे उद्योगधंदे सुरू करून रोजगार निर्मिती करावी. जवळपास २ ते ३ लाख रोजगार निर्माण होऊ शकते.
प्रामुख्याने पत्रकारांच्या मागण्या, जुनी पेन्शन योजना यांच्यावर येणाऱ्या काळात सकारात्मक निर्णय घेतले जाणार आहेत, तसेच निवृत्तीचे वय वाढवल, तर नवीन तरुणांना संधी मिळणार नाही. त्यामुळे निवृत्तीचे वय वाढवून देण्याच्या मागणीला विरोध आहे. अहमदनगर, जळगाव जिल्हा व इतर जिल्ह्यातील शिक्षकांचा पगार त्यांच्या पसंतीच्या बँकेत जमा व्हावा, तसेच पसंतीच्या बँकेत खाते उघडता यावे. त्यावर सरकारने दखल घेत शासन निर्णय जारी केला.
चौकट
यूथ इनोव्हेशन
सेंटरचे काम सुरू उत्तर महाराष्ट्रासाठी एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे ‘यूथ इनोव्हेशन सेंटर’ यावर १२ जानेवारी २०२४ रोजी फेसबूक लाईव्हवर सविस्तर चर्चा केली जाणार आहे. अनोखा प्रकल्प हा उत्तर महाराष्ट्रात सुरू झालेला आहे. पाच जिल्ह्यांमध्ये त्याचं बांधकाम सुरू झाले आहे. किमान ३०० ठिकाणी सब सेंटर देखील उत्तर महाराष्ट्रात सुरू करणार आहोत.
– -सत्यजित तांबे, आमदार
