प्रबोधन गीतांमधून उलगडतोय जीवन प्रवास
संगमनेर । झुंजार न्यूज
विद्यार्थी दशेत स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेऊन देशकार्यासाठी लढणाऱ्या स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात यांनी स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सहकारातून तालुक्यात आर्थिक समृद्धी निर्माण केली. गोरगरिबांच्या विकासासाठी तळमळ, ध्येय आणि जीवनातील तत्त्व व शिस्त घेऊन कार्य करणाऱ्या स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांचे जीवन कार्य पुढील पिढ्यांना नक्कीच स्फूर्तीदायी असून त्यांच्या विचारांचा जागर गावोगावी केला जात आहे.
जयहिंद लोकजागरच्या वतीने स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त विविध विद्यालयांमधून गीतांचे कार्यक्रम होत आहे .यामध्ये आदिवासी सेवक प्रा बाबा खरात, शाहीर शिवाजी कांबळे, सत्यानंद कसाब, शिवराम बिडवे ,भाऊ पांडे ,भीमा दिघे ,शिवाजी वाल्लेकर, जगन बर्डे आदींचा सहभाग आहे.
तालुक्यातील अमृतनगर, घुलेवाडी, तळेगाव दिघे, देवकवठे, कोळवाडे ,अंभोरे , पिंपरणे, वडगाव पान, नान्नज दुमाला , निळवंडे, सुकेवाडी, राजापूर, गुंजाळवाडी, पानोडी, चिखली धांदरफळ पेमगिरी निमगाव बुद्रुक या गावांमध्ये विविध कार्यक्रम झाले.
यावेळी बोलताना प्रा.बाबा खराब म्हणाले की, हे वर्ष सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यांचे जीवन कार्य विचार नवीन पिढीला समजावून सांगून त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या सामाजिक जीवनात वाटचाल करावी हा .या प्रबोधन यात्रेचा उद्देश आहे. साहित्य, सहकार, शेती,पर्यावरण, जलसंधारन, ग्रामीण विकास ,दुग्ध व्यवसाय या विविध क्षेत्रांमध्ये भाऊसाहेब थोरात यांनी नीती मूल्य व तत्व जपत आयुष्यभर योगदान दिले .त्यांच्या आदर्श वाटचालीवर संगमनेरचा अमृत उद्योग समूह काम करत असून संगमनेरच्या सहकार पॅटर्न हा देशासाठी मॉडेल ठरला आहे.

तर शाहीर शिवाजी कांबळे म्हणाले की, संगमनेर तालुक्याने कायमसंग आणि कलावंतांचा सन्मान केला आहे ही संस्कृती सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी रुजवली. गोरगरिबांच्या जीवनात आनंद निर्माण करणाऱ्या या सहकार ऋषीने सहकार क्षेत्रासाठी दिलेले भरीव योगदान देशासाठी मार्गदर्शक ठरणारे आहे. यावेळी प्राचार्य हरिभाऊ दिघे, प्राचार्य संजय लहारे, प्राचार्य किसन खेमनर, दशरथ वर्पे आदी उपस्थित होते.


