जयस्वाल समाजाच्या उन्नतीसाठी मुंबईत दोन दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन
मुंबई । झुंजार न्यूज
माजी गृहराज्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंह हे मुंबईत आयोजित केलेल्या अखिल भारतीय जयस्वाल महोत्सवात उपस्थित होते. जयस्वाल समाजाच्या उन्नतीसाठी आणि भविष्यात जयस्वाल कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी सोयीचे ठिकाण असायाला हवे, यासाठी राज्य सरकारकडे ‘जयस्वाल भवन’ उभारण्याची मागणी राज्य सरकारकडे करणार असल्याचे कृपाशंकर सिंह यांनी सांगितले.
जयस्वाल समाजाच्या संस्कृतीचा उत्सव साजरा करण्यासाठी अखिल भारतीय जयस्वाल कमिटीने मुंबईत दोन दिवसीय जयस्वाल महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून जयस्वाल समाजाचे असंख्य लोक मुंबईत एकत्र आले होते.
तसेच या कार्यक्रमादरम्यान जयस्वाल युथ फेडरेशनकडून तरुणांसाठी एक वेबसाइट देखील सुरू करण्यात आली आहे, जी जयस्वाल समाजातील तरुणांना त्यांच्या आवडीनुसार जीवनसाथी शोधण्यास मदत करेल. राजदीपकुमार म्हणाले, “वेबसाइट जयस्वाल तरुणांसाठी तयार करण्यात आली आहे जेणेकरून फक्त एक गुगल फॉर्म भरून आणि वेबसाइटवर नोंदणी करून त्यांना त्यांच्या आवडीचा जीवनसाथी शोधायला विनामूल्य मदत होईल.”
सरस्वती देवी चॅरिटेबल ट्रस्टचे ट्रस्टी राजदीपकुमार गुप्ता म्हणाले, “या कार्यक्रमाची रचना एका अनोख्या पद्धतीने करण्यात आली आहे. ज्यामध्ये मनोरंजना सह नवोदित प्रतिभा आणि रोजगाराच्या संधी शोधणाऱ्यांना रोजगार प्राप्तीसाठी व्यासपीठ मिळेल.”
अखिल मुंबई जयस्वाल सभा, श्री विंध्यवासिनी सेवा मंडळ, जयस्वाल सेवा संस्था, जयस्वाल समाज संस्था, कलवार समाज संघ, जयस्वाल समाज सेवा संस्था, जयस्वाल फाऊंडेशन आणि जयस्वाल परिवार फाउंडेशन यांनी या महोत्सवाचे आयोजन केले होते.
यावेळी रोजगार मेळावे, वैद्यकीय शिबिरे, करिअर समुपदेशन, गुंतवणदारांसाठी जागरूकता कार्यक्रम, प्रेरक भाषणे, महिलांसाठी स्वसंरक्षण कार्यशाळा आणि नृत्य सादरीकरण, विनोदी कविता वाचन आणि पतंग महोत्सव यासारखे विशेष कार्यक्रम मालाड चारकोप नका येथील सरस्वती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये १३ आणि १४ जानेवारी असे दोन दिवस आयोजित करण्यात आले होते.
“संपूर्ण जयस्वाल समाजाला एकत्र आणणे आणि समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करणे या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महिला, पुरुष आणि मुलांसाठी सामाजिक जागृती मोहिमेपासून आरोग्य शिबिरे, शैक्षणिक ते आर्थिक कार्यक्रम आणि तरुणांसाठी रोजगार मेळावे ते महिलांसाठी स्वसंरक्षण कार्यशाळांचे आयोजन या कार्यक्रमांतून करण्यात आले आहे.” असे सरस्वती देवी चॅरिटेबल ट्रस्टचे ट्रस्टी संदिप गुप्ता म्हणाले.
सरस्वती देवी चॅरिटेबल ट्रस्टचे चंद्रकांत गुप्ता आणि संचालक मंडळ, रूट मोबाईल यांच्या नेतृत्वाखाली हा महोत्सव पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी संतोषानंद देवजी महाराज उपस्थित होते. “जयस्वाल महोत्सवात समाजातील प्रत्येक वयोगटासाठी फायदेशीर असे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत हे समाजाच्या दृषटीने अत्यंत आवश्यक आणि फायदेशीर आहे” असे स्वामी संतोषानंद म्हणाले.
जयस्वाल युथ फेडरेशनचे अध्यक्ष विश्वनाथ कलवार म्हणाले, “जयस्वाल समाजात एकोपा पसरवण्यासाठी ओळखला जातो. समाजाला मदत करणे आणि एकमेकांमधील आदर वाढवणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे.” याप्रसंगी अंतिम कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, पाहुणे, व्यावसायिक, उद्योजक आणि उद्योगपतींचा सत्कार करण्यात आला आणि ‘संगीत संध्या’ ने या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
यावेळी इतर प्रमुख पाहुण्यांमध्ये श्रीमती. रमा देवी- लोकसभा प्रोटोकॉल स्पीकर, श्री श्रीपाद नाईक- पर्यटन आणि बंदरे राज्यमंत्री, श्री संजय जयस्वाल – लोकसभा खासदार आणि बिहार भाजपचे माजी अध्यक्ष, श्री कृष्णा प्रसाद- IPS आणि ADGP फोर्स वन, महाराष्ट्र सरकार, श्री सिद्धार्थ जयस्वाल – IRS जॉइंट कमिशनर कस्टम आणि एक्साईज मुंबई यांनी देखील या महोत्सवाला उपस्थिती दर्शवली होती.
