संगमनेर । झुंजार न्यूज
ग्रेप्स गार्डन येथे झालेल्या या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी आमदार बाळासाहेब थोरात, मा. आमदार डॉ.सुधीर तांबे, सौ.दुर्गाताई तांबे, सौ.कांचनताई थोरात, कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात लेखिका सौ सुलभाताई दिघे, ॲड शिवाजीराव दिघे, वैशाली कुलकर्णी डॉ.हसमुख जैन, संजय दिघे, श्रीमती ललिता दिघे, विलास दिघे, कृष्णा दिघे आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, परमपूज्य निर्मला देवी यांच्या सानिध्याने अध्यात्मिक उंची गाठलेल्या सहज योगाच्या प्रसारक सौ सुलभाताई दिघे यांच्या निर्मलसरिता या पुस्तकांमधून विविध घटना प्रसंग त्या मागील पार्श्वभूमी अत्यंत साध्या सोप्या आणि उत्तम पद्धतीने लिहिले आहेत. या पुस्तकातून सौ.सुलभाताई दिघे यांनी केलेली धडपड,शेती,समाजकारण, राजकारण आणि कुटुंब सांभाळून अध्यात्मातून इतरांच्या जीवनात निर्माण केलेल्या आनंद याचे वर्णन सुंदर पद्धतीने केले आहे.
महाराष्ट्रीयन माणूस कर्तृत्व करतो परंतु ते शब्दबद्ध करत नाहीत .त्यामुळे पुढील पिढीसाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या अनेक गोष्टी राहून जातात. या पुस्तकामुळे संगमनेरच्या साहित्य संस्कृतीत नक्कीच भर पडणार असल्याचेही ते म्हणाले.
तर मा.आ.डॉ.सुधीर तांबे म्हणाले की, संगमनेर शहराला मोठी साहित्य परंपरा असून विविध व्यक्तिमत्त्वांनी आपले अनुभव शब्दबद्ध केलेले आहे त्यामध्ये निर्मल सरिता या पुस्तकाचा नव्याने समावेश झाला आहे.
सौ.कांचनताई थोरात म्हणाल्या की, शेती आणि निसर्गात राहणाऱ्या सुलभाताईंनी संगीताची आवड ही जोपासली असून अध्यात्मातून नवी पिढी घडवली आहे. तर सौ.दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, दिघे मामी या आनंदाचा झरा असून त्यांनी आपल्या कुटुंबीयांसह नातेवाईकांमध्येही आनंद निर्माण केला आहे.सौ.सुलभाताई दिघे म्हणाल्या की, इतरांचा आनंद हा आपला आनंद मानून सर्वांनी काम केल्याने आनंदी समाज निर्माण होतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे संगमनेर तालुका होय.
यावेळी विविध मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या या पुस्तकाचे शब्दांकन सौ.वैशाली कुलकर्णी यांनी केले असून कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.दुर्गाताई तांबे यांनी केले तर संजय दिघे यांनी आभार मानले.

